Vrushali Athale

Vrushali Athale *Counseling Psychologist*Psychotherapist
*Marriage Counselor*Relationship counselor
*Career Counselor*Writer

28/09/2025

*मैत्री च्या तऱ्हा*
© वृषाली आठले
प्रत्येकाच्या मैत्रीत एखादा नाका, एखादा कट्टा, किंवा एखादा अड्डा असतोच. एका विशिष्ट वयात तो जितका खास असतो तितका तो नंतर राहतोच असं नाही. ह्याची कारणं अनेक असतात. सामान्य कारणं अशी की लहानपणीचे मित्र किंवा तरुणपणातले मित्र आपापल्या उद्योग, व्यवसाय, करिअर मध्ये स्वतःला सिद्ध करत असतात, मग प्रत्येकाचा "तो" किंवा "ती" आयुष्यात येते, आपापल्या संसारात ते रमतात. जबाबदाऱ्या वाढतात, अनेक अडचणींना तोंड देत असतात. वगैरे वगैरे.. पण हे सगळं अगदी स्वाभाविक आहे. तरीही ह्या नाक्याची मैत्री घट्ट रहाते. अगदी सगळा नाका किंवा कट्टा अशा घट्ट मैत्रीत बांधला जातो असं नाही. पण तरीही एकमेकाला भेटून फ्रेश वाटण्या इतपत ही मैत्री नक्की असते. जिथे भेटलो की तेच तेच विषय, तेच तेच विनोद असूनही मन हलकं होतं, पुन्हा लवकर भेटू असं ठरवलं जातं. जे प्रत्यक्षात मात्र कधीही होत नाही. पूर्वी वाटायचं की ह्याची कारणं अगदी प्रॅक्टिकल म्हणता येतील अशीच असणार. पण कालांतराने जशी भेटण्या मध्ये खूप gap पडायला लागली तसं जाणवलं की आपण समजत होतो तसं नाहीये. कदाचीत वारंवार भेटावं अशी फार शी ईच्छा नसावी ,किंवा ईच्छा असली तरी लोक म्हणतात तसं त्यांना भेटायला जमत नसावं, किंवा सहज भेट झालीच तर ठीक पण भेट नाहीच झाली तरी फार काही फरक पडत नसावा..आता ह्यातलं नेमकं काय हे ज्याचा तोच जाणे.
बऱ्याच काळाने गणपती निमित्त भेट झाली तेव्हा एका मित्राजवळ न आलेल्या दुसऱ्या मित्राची चौकशी करता फार मजेशीर उत्तर मिळालं...ते असं...की "अगं तो मजेत आहे, तुझ्या आयुष्यात त्याचा जेवढा सहवास होता तेवढा पूर्ण झाला असं समजायचं" भेटलेल्या मित्राने इतक्या सहजपणे हे म्हटलं की मी उडालेच.. हे विधान माझ्यासाठी मजेशीर वगैरे न राहता फार गंभीर तत्त्वज्ञान असल्यासारखं आरपार शिरलं माझ्या मनांत. आणि मग जाणवलं मानसशास्त्र आणि तत्वज्ञान कोळून प्यायलेली बाई आहे मी, पण मी इतक्या सहज हे सत्य पचवू शकत नाही. कारण मी अती जास्त सकारात्मक आहे. वास्तवातल्या गोष्टींकडे सतत सकारात्मक विचारांनी पहात असते मी. आणि ते तसंच असावं ह्यासाठी धडपडते. पण अलीकडे लक्षात आलं आहे की ही धडपड एकतर्फी आहे. मग आपोआप withdrawal घडतं. मनातून नाही, पण कृती नी अलिप्तता येते.
आमच्या मित्रांचे किस्से काही कमी नाहीयेत. आमच्या नाक्याची एक खास (पण माझ्या शब्दशः डोक्यात जाणारी) खासियत म्हणजे ग्रूप मधे अत्यंत आलतुफलतू पोस्ट वर react होतील, पण आपण जर वैयक्तिक नावं घेऊन (@) msg लिहिला तर वाचल्या नंतर सुद्धा अजिबात वाचलंच नाही असं दुर्लक्ष करतील. कोण वागतं असं??? असा प्रश्न मला गेली अनेक वर्ष भेडसावयचा....पण अलीकडे मी ते पचवलं आहे की हे फक्त आणि फक्त आपल्याच "जवळच्या" मैत्रीत घडतं. मला खरंच प्रश्न पडतो की जर काहीही संवाद च नसेल तर ही मैत्री जवळची असं आपण का म्हणतो? क्वचित कधीतरी भेटल्यानंतर थोडा वेळ चक्कलस केली की मैत्री जवळची होते का?? मग ह्या प्रश्नाचं उत्तर माझं मलाच मिळालं की मी च जास्त अपेक्षा ठेवत होते.. कदाचीत मैत्री ही अशीच असावी अनेकांसाठी. त्यात मी बसत नव्हते. आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत ठीक ठाक बसत नाही ना, तेव्हा आपल्यामध्येच प्रोब्लेम आहे म्हणावं आणि गप्प बसावं. कारण जेव्हा उरलेल्या समस्त मित्र मैत्रिणी ना हे खटकत नाही तेव्हा उघड असतं की आपण च 'Odd man Out' आहोत. आपण म्हणजे मी.
तसं नाही नाही म्हणत म्हणत आम्ही मित्रांनी काही छोट्या trips आणि मोठे tours एकत्र केले..खरच खूप धमाल केली. पण त्यात पण गंमत म्हणजे एखाद्या मित्राला प्रत्यक्ष ट्रिप ला जाण्यापेक्षा ट्रिप ठरवण्यासाठी meeting म्हणून भेटण्यात आणि चर्चा करण्यात जास्त इंटरेस्ट.. एकाला काय तर ठरत आलेली ट्रिप cancel करण्यातच जास्त इंटरेस्ट.. एखादा ह्यातलं काहीही कधीही आपल्या साठी नाहीच आहे असं समजून वरून ते तुम्हालाच कसं समजत नाही म्हणून हा तुमचाच कसा प्रोब्लेम आहे हे तुम्हालाच जाणवून देणारा...एखादा सगळ्यात सहभागी होईल पण ग्रूप वर मात्र कधीही न बोलणारा.. एखादा काहीही कारण नसताना उगीचच सगळ्यांचं विचित्र वागणं सांभाळून घेणं ही जणू त्याचीच जबाबदारी असल्या सारखं बोलणारा, मात्र स्वतः ही फार seriously कधीही काहीही न वाचणारा.. एखादा त्याला ग्रूप मधे add कराल तितक्या वेळा ग्रुप सोडणारा.. एखादा फक्त जसं काही दुसऱ्यांना good morning करणं एवढीच त्याच्यावर कुणीतरी जबाबदारी टाकल्या सारखा..इतकं की त्याच्या आगे मागे काय लिहिलंय ह्याचा सुतराम संबंध त्याच्याशी नाहीच असं वागणारा..एखादा कुणी कुठलीही पोस्ट करो राजकीय किंवा विनोदी.. सगळ्या पोस्ट ला आवर्जून अंगठा दाखवणारा, लाईक करणारा..एखादा एखाद्याच msg ला "मी अंगठा दाखवला होता" अशा defensive mode वर असणारा...तर असे आमचे मित्र... अर्थात ह्या एखाद्याच्या यादीत एखादा आणि एखादी दोन्ही आले बरं का.
कुणाचाही वाढदिवस असला की आवर्जून आठवणीने msgs असतात ग्रूप वर. जसे सगळे वयाने मोठे झालो तसे वाढदिवसाचं कारण काढून भेटलो, खास करून प्रत्येकाच्या ५० व्या वाढदिवशी नक्की भेटलो. आता एक एक करत आमची सगळ्यांची "साठी..बुद्धी नाठी" होणार हे उघड च आहे. ५० शी साजरी करण्याचा उत्साह ६० मध्ये राहतो की नाही कळेल च. असो...
मैत्री मध्ये boundaries असतातच. किंवा काही बाबतीत त्या असाव्याच. पण त्या कुठल्या बाबतीत असाव्या, आणि किती असाव्या हे मात्र प्रत्येकावर अवलंबून असतं. नेमका तिथे फरक पडतो. मला स्वतःला अभिप्रेत असलेला मोकळेपणा मला समोरून दिसला नाही की मी अस्वस्थ होते. किंवा मैत्रीत खूप जास्त boundaries असतील, आणि त्या स्पष्ट न सांगता वागण्यात दिसत असतील तर मग नेमकी मैत्री आहे म्हणजे काय आहे असे प्रश्न मला पडतात. निदान जे असेल ते खुलेपणाने सांगता येतं आणि जरूर सांगावं अशी जागा म्हणजे माझ्यासाठी मैत्री..अर्थात मी कोण? प्रत्येकासाठी ही गोष्ट वेगळी असूच शकते. पण निदान ते पोचतं करावं अशी सरळ साधी अपेक्षा असते. आणि जेव्हा हे घडत नाही तेव्हा अंतर वाढतं. कुणाला ते कळतं कुणाला कळत नाही. पण अंतर वाढतं नक्की. ह्यावर ह्यातल्याच "एखाद्याचं " म्हणणं असतं की मुळात मैत्रीत इतकं काही seriously घ्यायचंच नसतं. आणि काहीच seriously न घेणं मला फार झेपत नाही. तर अशी ही आमची मैत्री..म्हटली तर निखळ, स्वच्छ, कुठलंही राजकारण न शिरलेली, घरच्यांनाही सामावून घेणारी मैत्री. पण पारदर्शकता आणि भावनिक गरज ह्या महत्वाच्या दोन गोष्टींचा अभाव असलेली. आणि म्हणून आपण एकमेकांच्या जवळ आहोत असं भासवणारी पण अंतर असलेली. हे अंतर काहींना जाणवत असेल ही कदाचित, पण खटकत नसेल. किंवा अनेकांची भावनिक गरज च कमी असेल. ही शक्यता जास्त आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्या अनेक मित्र मैत्रिणींच्या बाबतीत असे अनेक अनुभव येतात. कुणी त्याची मोकळेपणी वाच्यता करतं, कुणी करत ही नाही. कुणी मैत्रीत मोकळं बोलणं झालंच पाहिजे अशा आग्रही मतांचं असतं तर कुणी बोलणं प्रशस्त नाही अशा विचाराचं असतं. एक मात्र नक्की की मैत्री हे नातं पूर्णतः निस्वार्थी असावं. तर अशी ही आमची संवादाविना असलेली मैत्री निस्वार्थीपणा मुळे टिकून असावी. थोडक्यात ह्या मैत्री च्या बाबतीत ठेविले अनंते तैसेचि रहावे.. हे धोरण ठेऊन मी माझ्या चित्ती समाधान बाळगून आहे!
© वृषाली आठले


*माझी अनवट अलिप्तता*   © वृषाली आठले        मन थेंबाचे आकाश       लाटांनी सावरलेले       मन नक्षत्रांचे रान       अवकाशी...
16/09/2025

*माझी अनवट अलिप्तता*
© वृषाली आठले
मन थेंबाचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
आपलं मन किती लहरी असतं. कित्येकदा स्वतःच्याच मनाचा अंदाज बांधता येत नाही आपल्याला. नेहेमी सारखं न वागता अगदी अनिश्चित असं काहीतरी वागतं. गेला काही काळ तुफान पाऊस पडला. असं वाटलं पाऊस जीव तोडून कोसळला! तो धो धो कोसळला,तो न थांबता बरसला, त्याने लोकांची गैरसोय केली, त्याने कष्ट करणाऱ्या लोकांना हैराण केलं. पाऊस वेड्या सारखा कोसळला खरा ... अवतीभवती खूप काही घडलं..पण तरीही माझ्या आत मध्ये काहीच घडलं नाही. हा पाऊस मला काहीच देऊन गेला नाही, आणि माझ्या कडून काहीच घेऊन ही गेला नाही. ना माझ्यासाठी तो सुंदर आठवणीं घेऊन आला, ना त्याने आयुष्यातले भरभरून जगलेले क्षण समोर आणले, ना त्याने माझ्या मनाचे हळवे कोपरे उलगडले..अगदी काहीही घडलं नाही. एरवी असं होतं ना...की हा पाऊस जेव्हा असा कोसळतो तेव्हा तो आपल्याला ही हलवतो. कधी खुश करतो, कधी उगीचच धुंद करतो..कधी एखादी सल, एखादं दुःख, किंवा आपल्या मनावरचं एखादं ओझं अलगद वाहून नेतो..आणि आपल्याला मोकळं करतो! पण ह्यावेळी असं काहीच घडलं नाही अशी ही पहिलीच वेळ असावी. काय गंमत आहे आपल्या मनाची..आपल्या मनाला सतत काहीतरी घडत राहावसं वाटत असतं. अगदी चांगलं वाईट, भन्नाट किंवा अगदी साधसं च काही...पण घडायला पाहिजे. नाहीतर उगीच बेचैन होतं मन. आणि काहीतरी घडलं की मग ते कामाला लागतं. ह्यावेळी जरा वेगळा अनुभव होता हा, अगदीच तटस्थपणे मी ह्या कोसळणाऱ्या पावसाकडे बघत होते. कुठून आली ही तटस्थता..हा प्रश्न नाही पडला मला. ही तटस्थता कुठून आली आणि कशामुळे आली ह्याची उत्तरं होती माझ्याकडे. पण का आली ही तटस्थता असं मात्र वाटून गेलं. इतकं तटस्थ वाटायला नको होतं मला असं वाटलं. तो मूळ स्वभाव नाहीये. मग मी बदलतेय का? जर हा बदल चांगला असेल तर काय हरकत आहे! आपल्यातला प्रत्येक माणूस बदलतो, परिस्थितीनी, अनुभवांनी किंवा क्वचित जाणीवपूर्वक ठरवून बदलतो. मला वाटतं मला जाणीवपूर्वक ठरवून बदलायला आवडेल.
आपल्यातल्या प्रत्येकाला ठरवलं तर बदलता येतं. त्यासाठी विचारांची स्पष्टता हवी. आणि अर्थातच भावनांची सुद्धा. गुंतागुंतीच्या भावना मनांत बाळगून सकारात्मक बदल नाही घडवता येत. कधीकधी विचार आणि भावना दोन्ही मधे स्पष्टता असताना, आणि होणारा बदल आपल्या स्वतःसाठी चांगला असतानाही आपण बदलायला धजावत नाही. कारण बदलताना जुनं काहीतरी सुटतं आहे ह्याची हळहळ जाणवत असते.
म्हणजेच अगदी जे आहे ते कुठेतरी सलणारं असलं तरीही आपण ते कुरवाळत बसतो कारण आपल्याला त्यातून मोकळं व्हावंसं वाटत नाही. ह्याचं खरं कारण अचानक आपल्याला रिकामं झाल्यासारखं होतं. आणि हे रिकामं रिकामं वाटणं आपल्याला जास्त त्रास देतं. ही मनस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येते.. ह्या पावसाळ्यात मी तो अनुभव घेतला. पाऊस कितीही मुसळधार कोसळला तरी तो पोचू शकला नाही माझ्या पर्यंत. इतकी अलिप्त झाले मी. आपल्या ही नकळत आपलं मन आपल्यालाच सांभाळत असतं (Coping Mechanism). आणि म्हणून उदास आणि अस्वस्थ व्हायचं नाही. ही मनस्थिती सुद्धा पूर्ण अनुभवायची, जगायची. असे रिकामं वाटण्याचे अनुभव आठवून पहा बरं. .आणि मग त्या रिकामपणाच्या पोकळीत सकारात्मकता भरता येते का पहा. फार सुंदर अनुभूती असते ही पण.
मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल!
ह्या पावसाने मला काही काळासाठी बाकी सगळ्यातून अलिप्त केलं खरं,पण माझं त्या अलिप्ततेतल्या पोकळी बरोबर ही नातं जुळलं. सोपं नसतं ना अलिप्त होणं.
© वृषाली आठले
Counseling Psychologist
Psychotherapist
16/9/2025






श्री कोपेश्वर मंदिर: अद्भुत स्थापत्य आणि ईश्वराचा वास!© वृषाली आठले १५/८/२०२५खिद्रापूर गावातील, कृष्णा नदी च्या पात्राती...
15/08/2025

श्री कोपेश्वर मंदिर: अद्भुत स्थापत्य आणि ईश्वराचा वास!
© वृषाली आठले
१५/८/२०२५
खिद्रापूर गावातील, कृष्णा नदी च्या पात्रातील श्री कोपेश्वर मंदिर बघितलं आणि अक्षरशः आवाक झाले मी. पूर्वी मला मंदिरं पहायला विशेष आवडायचं नाही. सगळ्यात मोठं कारण म्हणजे भाविकांची अतोनात गर्दी..आणि प्रत्यक्ष देवा समोर क्षणभर सुद्धा उभं राहता न येणं. पण जेव्हापासून योगशास्त्र भारतीय तत्त्वज्ञान वगैरे अभ्यास केला तेव्हा पासून मी आवर्जून अशी अनेक मंदिरं पहायला जाते. पण जेव्हा तिथे कुणीच नसेल त्या दिवशी आणि त्याच शांत वेळी जाते.महादेवाच्या मंदिराचं मला का कुणास ठाउक पण आकर्षण वाटतं.आपल्या हिंदू धर्मात शैव आणि वैष्णव हे दोन संप्रदाय आहेत. शैव संप्रदाय शिव म्हणजेच शंकर ह्या देवाला मानतात, आणि वैष्णव संप्रदाय विष्णू म्हणजेच नारायणाला मानतात.
शैव तत्त्वज्ञान ज्ञानाला आणि मुक्ती ला महत्त्व देते, तर वैष्णव तत्वज्ञान भक्ती आणि प्रेमाला महत्त्व देते. त्यांच्या उपासना पद्धती, आणि धार्मिक विधी यामध्ये फरक आहे.
आपल्या कडे महादेवाची अनेक मंदिरे आहेत तसेच विष्णू देवाची सुद्धा आहेत. परंतु महादेव आणि विष्णू देव एकाच मंदिरातील एकाच गाभाऱ्यात मी पहिल्यांदाच पाहिले. श्री शंकराच्या देवळात ते देखील केंद्रस्थानी गर्भगृहात दोन लिंगांचे एकत्रित दर्शन होते. शिव आणि विष्णू एकत्र असणारी अगदी कमी मंदिरे महाराष्ट्रात आहेत. यापैकी एक श्री कोपेश्वर मंदिराचे गर्भगृह आहे. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर, कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला, दक्ष कन्या सती च्या जाण्याने, विरहाने कापलेला महादेव..आणि त्याची समजूत काढण्याचे काम करणारा विष्णू देव म्हणजे धोपेश्वर. अशा दोन शाळुंखा इथे गर्भगृहात आहेत. गर्भगृहाच्या भिंतींवर १८ लतिकांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याचा वरचा भाग हा निमुळता होत जाणारा आणि वलयांकित आहे.आणि त्याच्या मध्यभागी झुंबराची रचना आहे. फक्त आतून च नाही तर बाहेरून पण हे मंदिर फार सुंदर आहे. सभामंडप आणि गर्भगृह ह्यांना जोडणारा एक अंतराळ कक्ष आहे. ह्याला खांब नाहीत. इथे भिंतींवर कोरलेल्या असंख्य सुंदर मूर्ती आहेत. आता खूप मूर्ती भग्न झालेल्या आहेत पण तरी सुद्धा त्यातला जिवंतपणा, कलावैभव, कारागिरांचं कौशल्य दाखवतात. देवदेवतांच्या मूर्तीं मध्ये महागणपती, सरस्वती, महिषासुरमर्दिनी,गंगा पार्वती सह श्री शंकर, लक्ष्मी माते सह भगवान विष्णू अशी अनेक शिल्प आणि मूर्ती आहेत.
ह्या मंदिराची निर्मिती १२ व्या शतकात शिलाहार राजवटीत झाली असा उल्लेख आहे. जवळपास ९०० ते हजार वर्ष जुने मंदिर आहे. काळ्याभोर पाषाणातून बनवलेलं हे एक कमाल सुंदर शिल्प आहे. ह्या मंदिराच्या आजुबाजूला जवळ जवळ ५० मैलाच्या परिसरात कुठेही काळया दगडाची खाण नाहीये. म्हणजेच हे मंदिर निर्माण केले ते दूरवर कुठेतरी असलेल्या खाणीतून.. तिथे शिलाखंड पाराखले, घडवले आणि इतक्या दूर मंदिर उभारले असावे. सगळच विशेष! मंदिराची रचना करताना हे मंदिर ९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतले आहे असे दाखवलेलं दिसतं. ह्या मंदिरात अत्यंत सुंदर सजावट असलेले १०८ खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची आहे. ४ विभागात दिसते.
ह्या मंदिरामध्ये सगळ्यात सुंदर काही असेल तर इथला स्वर्गमंडप! हा स्वर्गमंडप ४८ खांबांवर उभा आहे..गोलाकार, चौकोनी, षटकोनी अष्टकोनी असे अनेक आकार ह्या खांबांवर दिसतात. देवा समोर सादर करायच्या नृत्य, गायन, वादन अशा सेवा सादर करण्याची ही जागा म्हणजे रंगशाळा. मंदिरात करायच्या होम हवनाची ही जागा. ही जागा म्हणजे मोक्ष, म्हणजेच स्वर्ग प्राप्तीचे द्वार..म्हणून स्वर्गमंडप नाव असावं! इतर मंदिरांप्रमाणे ह्या महादेवाच्या मंदिरात नंदी नाही. हे अजून एक वैशिष्ट्य. असे म्हणतात खिद्रापूर पासून १२ किलोमीटर वर कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदी चे मंदिर आहे.
श्री कोपेश्वर मंदिर म्हणजे अद्भुत स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे! आपल्या भारतातील संस्कृती, आपल्या कला, आपलं पुरातन स्थापत्यशास्त्र, आपले देव देवता, आपले वेद पुराण, आपली शिल्प, आपली धार्मिक पौराणिक पार्श्वभूमी ह्या अशा अनेक भव्य मंदिरात दिसते. अभिमान वाटतो तेव्हा ह्या सगळ्याचा.सगळं पुन्हा पुन्हा पाहून डोळ्यात आणि मनांत साठवून घेऊन मी मस्त जप करायला बसले तिथे. उठून यावं असं वाटेना, इतकं शांत वातावरण तिथे होतं. स्थिरतेचं महत्व नव्याने जाणवलं.
© वृषाली आठले
Counseling Psychologist Psychotherapist




*कभिन्न काळोख्या रात्री* ©वृषाली आठले श्रावण महिन्यात दर वर्षी न चुकता आमची कोकणात एक फेरी असतेच.. हिरवं गार झालेलं आमचं...
29/07/2025

*कभिन्न काळोख्या रात्री*
©वृषाली आठले

श्रावण महिन्यात दर वर्षी न चुकता आमची कोकणात एक फेरी असतेच.. हिरवं गार झालेलं आमचं कोकण म्हणजे निसर्गाचा आशिर्वाद आहे! डोंगर दऱ्या धबधबे ओढे नद्या सगळं अनुभवताना भान हरपणं म्हणजे काय ते कळतं. पंचमहाभौतिक असं हे बाह्य विश्व पंचज्ञानेंद्रियांनी समजून घेणं हा श्रावण महिन्यातला कोकणातला एक खास अनुभव असतो! गंध रस रूप स्पर्श आणि नाद ह्या पाच ही गोष्टी अनुभवायला नक्की श्रावण महिन्यात कोकणात यावं. पानफुलांचा गंध, विहिरीच्या पाण्याची चव, दिवसा चहूबाजूंनी दिसणारा हिरवा कंच रंग, भात शेतातून झाडाझुडपांतून येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा स्पर्श आणि पशु पक्षांच्या किलबिलाटाचा, कोसळणाऱ्या पावसाचा, वाहणाऱ्या ओढ्याचा नाद..आयुष्य सार्थकी लागल्या सारखं वाटतं!

महालक्ष्मी चं दर्शन घेऊन तिथे पूजा करून कोल्हापूर वरून आंबा घाटातून कोकणात जाणं हा ठरलेला कार्यक्रम. आंबा घाट उतरताना जे काही धुकं होतं त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. धुक्याचा धूसर रंग खरा की धुकं दूर झाल्या नंतर दिसणारा हिरवा कंच रंग खरा..हिरवा कंच रंग म्हणजे ही मायावी दुनिया आणि धूसर रंग म्हणजे सत्य का? असा विचार मनात येऊन गेला.. गेला ते बरं झालं..ही मायावी दुनिया इतकी सुंदर असताना कशाला असे विचार! नेहेमीच्या ठिकाणी उतरून मस्त गवती चहाचा आनंद घेतला, आणि धुक्यात गाडी काढत घाट उतरलो..पुढे रस्त्याचे काम चालू असल्याने साखरपा मार्गे न जाता देवरुख संगमेश्वर मार्गे व पुढे भातगाव मार्गे लांबलचक न संपणाऱ्या रस्त्याने गावाला पोहोचलो. पोहोचे पर्यंत संध्याकाळ झाली. पावसाळ्यात गाडी वरती डोंगरात ठेऊन पायी च खाली जावं लागतं. गाडी वरती रस्त्याजवळ ठेऊन समान घेऊन खाली उतरणं म्हणजे दिव्य होतं. मुसळधार पाऊस, निसरडी वाट..पाय जपून टाकत कसेबसे खाली घरी पोहोचलो. काळोख झालेला, घर उघडून आत येत नाही तर light गेले, ते जे गेले ते पुढे ३ दिवस आलेच नाहीत. कुठेतरी मेणबत्ती शोधून आम्ही दोघं आणि आमचे दिवाकर दादा, तिघांनी घर झाडून काढलं. ते जर आले नसते तर अख्खी रात्र आम्हाला कार मधेच बसावं लागलं असतं किंवा तशीच गाडी फिरवून कुठे दुसरी कडे हॉटेल वर रहावं लागलं असतं..म्हणजे कित्येक किलोमीटर दूर. सगळी साफसफाई करून
चहा केला आणि जे बसलो तेव्हा सगळं लहानपण आठवलं. आई बाबा किती वर्ष हे असं करत आले आहेत. दर वेळी मुंबई मधून आलं की हातात केरसुणी खराटा घेऊन सगळं घर स्वच्छ करा, मग पुढच्या अंगणापासून मागच्या पडवी पर्यंत सगळं घर पुसून काढा. मग चहा साखर हळद तिखट हिंग मोहोरी पासून संसार थाटा...तेव्हा कुठे आमटी भात जेवता येणार. पण दोघं भयंकर उत्साहाने सगळं करत आले. आम्ही मुलं काय जेमतेम २ ते ३ दिवस राहणार पण त्यांना तयारी करणं किती कठीण होतं हे आठवतं.

रात्री अक्षरशः पोहे करून खाल्ले आणि झोपायचं ठरवलं. Light येतील म्हणून वाट पाहून अख्खी रात्र गेली. मिट्ट अंधार, डोळे कितीही विस्फारून पाहिलं तरी जवळ असलेलं आपलं माणूस सुद्धा दिसत नव्हतं. नवऱ्याच्या भाषेत म्हणजे डोळे उघडले तरी स्वतःचेच डोळे उघडे आहेत की बंद ते ही कळत नव्हतं असा अंधार! पावसाने जोर धरला होता. वेड्या सारखा कोसळत होता. रात्री चित्रविचित्र आवाज येत होते. भीती वाटण्याच्याही पलीकडे गेलो होतो आम्ही दोघं. अख्ख्या गावात बाजूच्या एका घरात २ माणसं आहेत एवढी जाणीव सोडली तर सगळं भयानक च होतं. डोळ्यांना काहीच दिसत नसल्यामुळे मन अजूनच अंतर्मुख झालं. एकदम जाणवलं की आपण निसर्गापासून किती लांब गेलोय. हा गडद अंधार हे ही निसर्गाच च रूप ना..मग आपल्याला त्या अंधाराबरोबर समरस का नाही होता येत..आपण शहरात सतत उजेडात असतो, अगदी रात्री सुद्धा उजेड असतो आपल्या सोबतीला. सतत चकचकाट, सतत झगझगाट असतो आपल्या भोवती. गावाला आलं की सूर्यास्तानंतर चा संधिप्रकाश मग हळू हळू होणारा अंधार तीव्रपणे जाणवतो. इथे पहाटे पासून तिन्हीसांजे पर्यंत चुलीपाशी, गुरढोरांपाशी, शेतात राबणारे जीव ह्या अंधारात सहज मिसळतात, शांत होतात. घरातल्या देवघरात दिवे लागतात, तुळशीपाशी अंगणात दिवा लागतो, तसंच बाजूला गणपती च्या देवळात ठरलेल्या वेळी घंटा वाजते, आणि पूजा करणारा आमचा कांत्या दादा किंवा त्याची पत्नी गाभाऱ्यात दिवा लावतात. आत्ता श्रावणात घरी फुलणारं ब्रह्मकमळ दादा श्रद्धेनी देवाला वाहतो..त्या दोघांचा तो नेम पाहून छान वाटलं! कितीही पाऊस कोसळो, कुठलाही ऋतू असो ठरलेल्या वेळी देवळाच्या गाभाऱ्यात दिवा लागतो..आणि अंधारात गाभारा उजळून निघतो!

दिव्याने उजळून निघालेला गाभारा पाहिला आणि गणपती पुढे हात जोडताना सहज विचार मनांत आला की आता मी कधी अंधाराला नाही घाबरणार. अंधार म्हटलं की भय असं आपल्या मनात ठसलं आहे..त्यानंतर रात्री झोपताना आम्ही कंदील लावण्या ऐवजी घरातला मोठा तेल वातीचा दिवा घरांत एका कोपऱ्यात लाऊन च झोपलो. दोन्ही मधला फरक अनुभवला. फार शांत वाटलं! अंधारात प्रत्याहार सहज शक्य असतो असं जाणवलं! बहिरंग योगा कडून अंतरंग योगा कडे जाण्याचा मार्ग म्हणजे प्रत्याहार.. बाह्य विश्वाकडून हळू हळू स्वतःच्या आत डोकावणं.. दिवसभराची स्वतःची कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर बाहेर धावणाऱ्या चित्त वृत्ती शांत करणं, अंतर्मुख होणं हा अंधार आपल्याला शिकवतो असं वाटलं. एखादी गोष्ट मनाने समजून घेणं आणि मनाला समजून सांगणं अंतर्मुख झाल्यावर जमू लागतं.
"तत:परमा वश्यतेन्द्रियाणाम् "
© वृषाली आठले
Counseling Psychologist Psychotherapist
२९/७/२०२५




We at 'Manaswasthya' recently had a chance to closely interact with Finance and Mental Health professionals. The result ...
13/07/2025

We at 'Manaswasthya' recently had a chance to closely interact with Finance and Mental Health professionals. The result was amazing - an extensive learning experience for Mental health professionals on managing personal Finance and for the Finance professionals of KRM securities to understand importance of Mental health and its applications on personal and professional lives.

Being completely different events, it’s interesting to see the overlap of how some skills and abilities are transferable across fields. Never too late to learn something new :)

(खिडकी)©वृषाली चारुदत्त 6/7/2025खिडकीत उभं राहून एक टक बाहेर पाहणं.. दूरवर जाणारा रस्ता, बाहेरची हिरवळ पाहणं, उन पाऊस अं...
06/07/2025

(खिडकी)
©वृषाली चारुदत्त
6/7/2025
खिडकीत उभं राहून एक टक बाहेर पाहणं.. दूरवर जाणारा रस्ता, बाहेरची हिरवळ पाहणं, उन पाऊस अंगावर घेणं... खिडकीत उभं राहून येणाऱ्याची वाट पाहणं, घराबाहेर जाणाऱ्याला खिडकीत उभं राहून अच्छा करणं...त्याने जाताना पुन्हा मान वळवून मागे आपल्याकडे पाहताना त्याला पाहणं आणि सुखावणं...
कधीतरी निवांतपणे चहाचा कप हातात घेऊन बाहेर बघत बसून राहणं, तसंच बसून गत काळातल्या आठवणींमध्ये रमून जाणं..खिडकीतून येणारा पश्चिमेचा थंडगार वारा अंगावर घेताना अंगातून जाणारी शिरशिरी अनुभवणं..अशी किती घरं आणि किती खिडक्या असतील ज्या अनेक भावभावनांच्या साक्षीदार असतील!
©वृषाली चारुदत्त
Counseling Psychologist, Psychotherapist

*रानजाई* © वृषाली आठले आज खूप महिन्यांनी घरातली रानजाई खूप फुलली! मधल्या काळात अनेक महिने गुलाब फुलले..मोगरा फुलला..पण ह...
29/05/2025

*रानजाई*
© वृषाली आठले
आज खूप महिन्यांनी घरातली रानजाई खूप फुलली! मधल्या काळात अनेक महिने गुलाब फुलले..मोगरा फुलला..पण ही काही फुलेंना. तेव्हा वाटायचं रानजाई ला घरी आणलं म्हणून ती रुजत नाहीये का..की गुलाबाचे इतके भडक रंग पाहून ती स्वतःच्या रंगावर नाराज तर नसेल..तिला सांगावं का की बाई ग तुझा मोतिया पांढरा रंग खूप सुंदर आहे, तुझा गंध वेड लावणारा आहे! हे नाहीये ह्या गुलाबांकडे.. मग वाटलं आपल्याच मनाचे खेळ सारे. ती तिची तिची फुलेल, बहरेल, तिची वेळ झाली की.. तिचं मन मोहरुन आलं की.
आणि आज अचानक दुसरं कुठलंही फुल झाडावर नसताना ही फुलली, बहरली! ओळखीच्या गंधाने खिडकी जवळ गेले आणि दिवसभर मरगळलेल्या माझ्याच मनाला ताजंतवानं केलं तिने.
ह्या रानजाई ला ही खरच मन असेल का! आणि माझं मन तिला कळलं असेल का!!
©वृषाली चारुदत्त
29/5/2025






04/05/2025

*घर कौलारू*
©वृषाली आठले
4/5/25
"आज अचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू..."
माहेरी मूळ घरी जाताना पावलं झपझप पडत होती, तरीवरून घराकडे जाणारा रस्ता उगाचच लांबलचक आहे असं वाटत होतं. रस्ता कुठला ,पाऊलवाट च ती... खाडी च्या किनाऱ्या वरून नागमोडी जाणारी पाऊलवाट आपल्याला घराकडे नेताना असंख्य खुणा दाखवते आहे असं वाटलं, बालपणी आई वडिलांचं बोट धरून तुडवलेली ही वाट आता त्यांच्या सारखीच थकल्या सारखी वाटली. मन आधीच घरापर्यंत पोचलं होतं, पावलांचा वेग कमी होता पण मनाचा कमाल..पायऱ्या उतरून अंगणात पोचलं आणि गतकाळात गेलं सरळ. सगळं लहानपण डोळ्यासमोर आलं. आजोबांनी बांधलेलं हे घर, जिथे माझ्या बाबांचा , काका चा जन्म झाला..जिथे आत्या मोठ्या झाल्या..जिथे आम्ही भावंडं प्रत्येक सुट्टीत बागडलो ते घर. खाडी किनारी असलेल्या ह्या कौलारू घराने प्रत्येक पाहुण्याला वेड लावलं आहे ते हे घर. उर भरून आला. आमची वाट पाहत ओटीवर बसलेली आजी आठवली..
"माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध कंकणे करीती किणकिण
किणकिण ती हळू, ये कुरवाळू
दूर देशीचे प्रोढ लेकरू..
खेड्या मधले घर कौलारू.."
देवघरातले तिचे देव, तिची अन्नपूर्णा, शाळीग्राम, लंगडा बाळकृष्ण, आणि हातात बासरी धरलेला तरुण कृष्ण.. आजी कृष्ण भक्त होती.. आचार विचारांनी सुधारक होती..तरी सुद्धा आम्हा सगळ्या नातवंडांना नजर लागायला नको म्हणून काळा गोफ मंत्रवून द्यायची. "कुठला मंत्र म्हणतेस तो सांग ना" असं मी लहानपणी खूप वेळा विचारलं होतं तिला, पण म्हणायची की सांगितलं की ती विद्या कमी होईल. मंत्रा चं शास्त्र जपत होती मायेपोटी. देवापुढे हात जोडले तेव्हा तिच्या आठवणी ने रडू आलं. सगळं जपण्याची बाबांची धडपड तीव्रपणे जाणवली.
मागच्या पडवीतून बाहेर गेलं की आमची विहीर, ह्या विहिरीवर लहानपणी रहाट ओढणारा एक रेडा होता, ’फाट्या ’ म्हणायचो त्याला. बाजूला एक हौद, तो अजून तसाच आहे. मी आणि माझा भाऊ तो हौद भरून गळ्या पर्यंत पाण्यात त्यात उभे राहून खेळायचो. वाटलं उगाच मोठे झालो.. विहिरीच्या मागे अनेक वर्ष खंबीर उभा असणारा फणस जेव्हा काही वर्षांपूर्वी वीज कोसळून जळून गेला तेव्हा ते सांगताना बाबा रडले होते.."एक काळ अचानक वडील गेल्या नंतर ह्या फणसाच्या झाडावर आमचा उदरनिर्वाह होता" असं म्हणाले होते. आज आम्ही भावंडं मुलं, मुलांचा मित्रपरिवार सगळे ज्या ओढीने घरी आलो हे पहायला आजी असती तर खुश झाली असती..माझी प्रजा आहे म्हणायची..मी चिडवायचे तिला की "आजी तू काय स्वतःला राणी समजते का ग!"
माझे दोन्ही काका, काकू, आम्ही चुलत भावंडं, वाहिन्या , आई बाबा , आमचं सगळं कुटुंब ह्या घरात जेव्हा जेव्हा एकत्र जमलो ते दिवस ह्या घराचे सगळ्यात आनंदाचे दिवस असतील.. असं वाटलं की ह्या घराने कायम सगळ्यांची वाट पाहिली असेल.
"माहेराची प्रेमळ माती
त्या मातीतून पिकते प्रीती
कणसावरती माणिकमोती
तिथे भिरभिरे स्मृती पाखरू
खेड्या मधले घर कौलारू..."
घरात शिरताच पडवीत च आजोबांनी बांधलेली एक मोठी घंटा, ओटी च्या मधल्या खांबाला असलेला अभ्रा, माजघरातला देव्हारा, बाजूच्या भिंती वरचा लामणदिवा, स्वैपाकघरातली चूल सगळं काही तसंच, माणसांची वाट पहाणारं.. मुलांची वाट बघत बसलेली समंजस आई असते अगदी तसंच.
मोजून चार दिवस मुलं, सून , मुलगी, जावई, नातवंडं आल्यावर आई बाबा दोघांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. आंबे, फणस, फणसाची भाजी, काजू, सुने ला आवडतात म्हणून रातांबे.. सगळं देण्याची त्यांची माया पाहून वाटलं आपण भाग्यवान आहोत. घरच्या अळू ची पानं बांधून देणारे काका काकू..अजून काय हवं.
आमच्या मूळ घरातून निघताना दाराबाहेर पायरी वर बसल्यावर जाणवलं इथे आपलंच मन अडकलं आहे तर आई बाबांचं हळवं होणं किती स्वाभाविक आहे! आई बाबांच्या किंचित कापणाऱ्या हातात आणि खंबीर मनांत काय काय असेल ते त्यांनी न सांगताही त्यांच्या डोळ्यांत स्वच्छ दिसलं..ते दोघं आणि घर ह्याचं त्या वेळचं मनोगत एकच असावं..."येत रहा या घरी".
"आयुष्याच्या पाऊलवाटा
किती तुडवल्या येता जाता
परी आई ची आठवण येता
मनी वादळे होती सुरु
खेड्या मधले घर कौलारू
घर कौलारू!"
ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेलं
"खेड्या मधले घर कौलारू " हे माझ्यासाठी नुसतं गीत नसून अनुभूती आहे.
©वृषाली आठले
Counseling Psychologist, Psychotherapist.









रंग निसर्गाचे © वृषाली आठले उत्तराखंड ला देवभूमी असं का म्हणतात हे इथे प्रवास करताना सतत जाणवतं. प्रत्येक ऋतू मधलं सौंदर...
22/04/2025

रंग निसर्गाचे
© वृषाली आठले
उत्तराखंड ला देवभूमी असं का म्हणतात हे इथे प्रवास करताना सतत जाणवतं. प्रत्येक ऋतू मधलं सौंदर्य वेगळं.
गंगेच्या काठावर राहणं हा खास अनुभव होता ह्यावेळी. बाल्कनी मधून सकाळी उजाडल्या पासून रात्री पूर्ण अंधार होई पर्यंत गंगा पहावी तेव्हा वेगळी भासत होती.
सूर्योदय, उन्हाने तापलेली दुपार, तिन्हीसांज, आणि रात्र ह्या सगळ्या वेळा गंगे च्या तीरावर अनुभवणं सहज शक्य झालं होतं. थंडगार वारा, इतक्या उन्हात सुद्धा अनेक बहरलेली फुलझाडं, गंगे मध्ये rafting करणारी तरुणाई आणि आपल्याला असणारा निवांत मोकळा वेळ असं सगळं जमून आलं होतं.
डोळे बंद करून शांत जागेत ध्यान करण्यासाठी बसावं की उघड्या डोळ्यांनी गंगे कडे एकटक पहात बसावं कळत नव्हतं. देवाने दिलेल्या पंच ज्ञानेंद्रियांनी इथल्या निसर्गाचा आनंद उपभोगावा की ह्या पंच ज्ञानेंद्रियांना ताब्यात ठेऊन त्यांची बाह्य धाव नियंत्रित करून प्रत्याहार करावा...हे द्वंद्व होतं. कानावर गंगेच्या वाहत्या पाण्याचा आवाज पडत होता, अंगाला थंडगार वारा स्पर्श करत होता, डोळ्याला मधुमालती, कांचन, जास्वंद, रातराणी अशी अनेक रंगांची फुलं दिसत होती, त्याचा गंध हवेत भरून राहिला होता...ह्या सगळ्याचा अनुभव हीच ध्यान धारणा झाली होती माझ्यासाठी. निसर्गाचा मोह नाही टाळायचा, विधात्याने आपल्या सकट जे काही निर्माण केलं आहे ते सगळंच सुंदर आहे.
पुरुष आणि प्रकृती / जीव आणि सृष्टी चा जितका अभ्यास केला तितकच प्रत्यक्ष अनुभव आणि रसग्रहण सुद्धा महत्त्वाचं आहेच की!
© वृषाली आठले
Counseling Psychologist, Psychotherapist

*देवप्रयाग*© वृषाली आठले      22/4/25ऋषिकेश ला गंगे च्या किनारी ध्यानधारणा करण्यासाठी गेलो असताना अचानक मनांत आले देवप्र...
22/04/2025

*देवप्रयाग*
© वृषाली आठले
22/4/25
ऋषिकेश ला गंगे च्या किनारी ध्यानधारणा करण्यासाठी गेलो असताना अचानक मनांत आले देवप्रयाग ला जावं. उत्तराखंड मधील तेहरी गढवाल जिल्ह्यामध्ये अलकनंदा आणि भागीरथी ह्या दोन नद्यांचा संगम होतो आणि मग गंगा बनून ती पुढे वहाते. हा संगम म्हणजे देवप्रयाग. देवप्रयाग चा अर्थ "ईश्वरीय संगम". पंच प्रयाग पैकी हा एक प्रयाग आहे. अतिशय शांत आणि सुंदर ठिकाण आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्या शिवाय विश्वास बसत नाही हेच खरं. एका बाजूनी उसळत येणारी, अवखळ,अल्लड वाटणारी अलकनंदा नदी, जिचं पाणी फेसाळतं आणि निळसर रंगाचं दिसतं..आणि दुसऱ्या बाजूनी अतिशय शांत, जराही आवाज न करता वाहणारी भागीरथी नदी, जिचं पाणी हिरवं गार दिसतं, ह्या दोघींचा संगम होऊन त्या गंगा होतात! इतक्या वेगळ्या दिसणाऱ्या वेगळ्या प्रवृत्ती च्या वाटणाऱ्या दोन नद्या एकरूप होताना पाहणं हा अविस्मरणीय अनुभव होता. तीर्थस्थळ म्हणून काही लोक आवर्जून डुबकी मारत होते, कुणी श्रद्धेनी नदीची पूजा करत होते. आम्ही शांतपणे संगमावर त्या नदीत पायावर थंडगार पाणी घेत बराच वेळ उभे होतो..आणि नद्यांच्या संगमचं ते दृश्य डोळ्यांत साठवून घेत होतो!
भगवान राम आणि दशरथ राजा इथे ध्यान आणि तपस्या करण्या करिता यायचे असे मानले जाते. अर्थात त्याचे दाखले ही मिळतात च. ऋषिकेश वरून बद्रीनाथला जाण्याच्या रस्त्यावर जसे हे देवप्रयाग आहे. तसेच त्या आधी ’वशिष्ठ गुहा’ पण आहे. ऋषी वशिष्ठ हे ब्रम्हदेवाचे मानसपुत्र ( मानव पुत्र) मानले जातात,तसेच सप्तर्षी पैकी सगळ्यात प्रतिष्ठित ऋषी समजले जातात. ज्या इक्ष्वाकु वंशात रामाचा जन्म झाला त्या कुळाचे गुरु म्हणजे वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ ऋषींनी ह्या एका गुहेत बराच काळ ( कालावधी) ध्यान केले हा इतिहास आहे. तिथे बाजूला छोटा आश्रम विकसित झाला ज्याची देखभाल करण्याचा निर्णय स्वामी पुरुषोत्तमानंद यांनी घेतला. गेले ४० वर्ष कनौज चे एक ब्राह्मण मिश्रा जी तिथे सेवा व देखभाल करत आहेत. त्यांची ही भेट झाली. त्यांच्या कडून प्रत्यक्ष माहिती मिळाली.
योगशास्त्राचा अभ्यास करताना "योगवासिष्ठ" ग्रंथा चा थोडासा अभ्यास करण्याची संधी मिळाली होती, त्यामुळे लक्षात आलं की हा ग्रंथ म्हणजे राम राजा आणि त्यांचे गुरु वशिष्ठ ऋषी यांच्यातील संवाद आहे. असे वशिष्ठ ऋषि जे प्रत्यक्ष राम राजाचे गुरु जिथे बसून ध्यान करत असत ती गुहा बघायला मिळाली हा एक छान योग आला. ध्यान धारणा करणारे काही पर्यटक तिथे आत बसून ध्यान धारणा करत होते.
संपूर्ण अंधार असलेल्या त्या गुहेत शिवलिंग आहे त्यापुढे २/३ तेल वाती चे दिवे तेवत होते तेवढा च काय तो प्रकाश. स्वतःचं बोलणं आपोआप बंद झालं, मन शांत होणं अनुभवलं.
जे शिकले त्याचा प्रत्यय आला. एकाग्रता आणि ऐकतानता काय असते ह्याची अनुभूती आली.
देवप्रयाग आणि वशिष्ठ गुहा ह्या दोन्ही ठिकाणी जाऊन परत येताना मनात आलं की ज्यांना ऐतिहासिक पौराणिक संदर्भ माहिती आहेत त्यांनी ते पाहण्या साठी यावं , हिंदू धर्मात अत्यंत पवित्र तीर्थस्थळ मानतात म्हणून यावं, किंवा दोन नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी निसर्गाचं सौंदर्य पाहायला यावं... कोणत्याही कारणानी यावं पण आपल्या देशाची, हिंदू धर्माच्या शिकवणीची, आणि इथल्या निसर्गाची ओळख करून घ्यावी.
© वृषाली आठले
Counseling Psychologist, Psychotherapist





*ओळखीचे अनोळखी*©वृषाली आठले 20/4/25 आपण ह्याला ओळखतो त्याला ओळखतो असं म्हणतो खरं पण खरंच असे कितीसे एकमेकांना ओळखत असतो ...
21/04/2025

*ओळखीचे अनोळखी*
©वृषाली आठले
20/4/25
आपण ह्याला ओळखतो त्याला ओळखतो असं म्हणतो खरं पण खरंच असे कितीसे एकमेकांना ओळखत असतो हा प्रश्र्न अनेकदा पडतोच. मला खूप वेळा असं वाटतं की आपली एखाद्याशी आधी जुजबी ओळख असते, मग परिचय वाढतो आणि आपण परिचीत आहोत असं म्हणायला लागतो, मग परिचय वाढला की मैत्री होते, मग हळू हळू क्वचित काहीच लोकांशी आपली घट्ट मैत्री. एक चक्र पूर्ण होतं.. मग त्यात आपल्याही नकळत दोघांच्याही मर्यादा विचारात घेता एक तोचतोच पणा यायला लागतो.. ह्याचं कारण आपण एकमेकांना खूप च ओळखायला लागतो, इतकं की आता कुठल्या गोष्टीवर हा आपला ओळखीचा/ मित्र कसा react होणार आहे, काय बोलणार आहे, ते तो कसं बोलणार आहे हे सगळं आपल्याला अगदी नेमकेपणाने माहिती असतं. मग त्यातली गंमत हळू हळू कमी व्हायला लागते.. तरीही नवीन माणसांच्या अनपेक्षित वागण्या बोलण्याशी जमऊन घेण्यापेक्षा आपल्या जीवाभावाच्या मैत्रितला तोचतोचपणा आपल्याला जास्त आवडतो. पण ते त्या मैत्रीतलं प्रेम असतं म्हणून च. अन्यथा त्यात म्हणावा तितका freshness, ताजगी, टवटवीतपणा दर वेळी असतोच असं नाही. जी आपली गरज असते.
माणसांना भेटून आपल्याला किंवा आपल्याला भेटून समोरच्याला फ्रेश वाटायला हवं. ती एक वेगळीच एनर्जी असते, ऊर्जा असते! भटकंती करताना नवीन माणसांना भेटून मला ती ऊर्जा भरभरून मिळते.
कोकणात गावाला जाताना कशेडी घाटात परशुराम जवळ एक छान मिसळ बनवणारे काका आहेत,तिथे त्यांच्या हातची मिसळ तिथे बाहेर झाडाखाली मांडलेल्या खुर्चीवर बसून खाणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं हा ठरलेला कार्यक्रम. गार वारा अंगावर घेत, खालून वाहणारी वसिष्ठी नदी बघत थोडा वेळ बसायचं. ते असं आपुलकीने चौकशी करतात की वाटावं आपले कुणी जुने शेजारी असावेत. हिमाचल प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी काही ड्रायवर दादा भेटले आहेत आजवर. अनेक जण माझ्या संपर्कात आहेत, ते पुढच्या वेळची सोय म्हणून नाही, तर त्यांच्या बरोबर च्या गप्पांमधून त्यांच्याशी जो सूर जुळला त्यामुळे. त्याचं आयुष्य, त्यांचे अनुभव, त्याचं लहानपण ह्या सगळ्या गोष्टी अपरिचित असतानाही त्यांनी मला सांगितल्या तेव्हा जाणवलं ते त्यांना माझ्या विषयी वाटणारं आपलेपण. आणि आपल्याला ही बाई नक्की judge करणार नाही हा विश्वास. अजून काहीच विशेष नको असावं माणसाला हे नक्की. वास्तविक स्वतःच्या आयुष्याविषयी काहीतरी दुसऱ्याला सांगणं किंवा दुसऱ्याच्या आयुष्याविषयी ऐकणं ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे म्हटलं तर सगळ्यात मोठी देवाणघेवाण असते माणूस म्हणून. आत्मकेंद्री न राहता त्या वेळी तुम्ही त्या अनोळखी माणसाचे तेवढ्या वेळे पुरते कुणीतरी होता, तो माणूस तुमचा होतो. कारण विचारांची भावनांची देवाण घेवाण होते..अतिशय सहज, निरपेक्षपणे.
कधी भटकंती करताना आवडलेल्या ढाब्यावर, हॉटेल मधे मी अगदी पुन्हा पुन्हा जाते तेव्हा आपल्याला छान गरम गरम आलू पराठे, मुली पराठे करून खाऊ घालणारा तो किंवा ती ही अन्नपूर्णेची रूपं असतात असं वाटतं मला. तिथे नाश्ता करताना त्यांच्याशी मारलेल्या गप्पा म्हणजे काही गहन विषय नसतानाही हलक्या फुलक्या गप्पांमधून त्याचं आयुष्या विषयीचं तत्वज्ञान जाणून घेता येतं इतकं अर्थपूर्ण असतं ते. Housekeeping करायला येणारी एखादी स्थानिक बाई जेव्हा कचरा काढताना आपल्याशी बोलते तेव्हा ते तिच्या आयुष्याचं रडगाणं नसून तिच्या छोट्याशा जगातलं काहीतरी ती आपल्याला सांगते तेव्हा तिच्या आणि आपल्या अनुभवात फक्त एक स्त्री म्हणून कुठे साधर्म्य आहे का हा विचार हळूच मनामध्ये डोकावतो माझ्या. पहाड चढताना, ट्रेकिंग करताना एखादा तरुण निसर्गाची आपल्या ओळख करून देतो तेव्हा तो आपल्यापेक्षा निसर्ग जाणून घेण्यात किती अनुभवी आहे हे लक्षात येतं. स्वतःच कुटुंब आणि घर लांब ठेऊन आलेली एखादी तरुण मुलगी ज्या पद्धतीने परक्या प्रांतात येऊन हॉस्पिटॅलिटी ह्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करते तेव्हा मस्त वाटतं मला. असं वाटतं हिच्या आई वडिलांना कल्पना तरी असेल का की आपली मुलगी किती धीट आहे, आपल्यापेक्षा किती वेगळा अनुभव घेते आहे जगण्याचा.. असे असंख्य ओळखीचे अनोळखी माझ्या आयुष्यात आहेत. ज्यांनी माझं अनुभवविश्व भरलेलं आहे..त्यात दर वेळी नव्याने वाढ होत असते. ते माझे आणि मी त्यांची कुणी नाहीये असं कधी वाटत च नाही मला. उलट ही माणसं जेव्हा जेव्हा सहवासात येतात, संवाद होतो, तेव्हा तेव्हा माझं आयुष्य टवटवीत करतात. माझं जगणं समृध्द करतात. आज आत्ता संध्याकाळी चहा घेऊन शांत बसले असताना एक एक करत कित्येकांची आठवण आली! आणि अगदी तिन्हीसांजेच्या कातर वेळी मन अस्वस्थ न होता अगदी प्रसन्न झालं! अशा माझ्या सगळ्या " ओळखीच्या अनोळखी" लोकांची मी ऋणी आहे!
©*वृषाली आठले*
Counseling Psychologist, Psychotherapist.

Address

Dombivli East

Opening Hours

Tuesday 5pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
Thursday 5pm - 9pm
Friday 10am - 1pm
Saturday 5pm - 9pm
Sunday 10am - 1pm

Telephone

+919769083479

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrushali Athale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vrushali Athale:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram