Dr.Swati Dharmadhikari

Dr.Swati Dharmadhikari Officiating Principal, Tirpude College of Social Work,practicing clinical psychologist, Authored books columns in dailies Run Tele helpline -9422806749

05/04/2023

Will start reposting further parts of तृष्णा...soon 🔜

nwin malika
23/08/2021

nwin malika

आज पासून ‘न लिहिलेली पत्रे’ वर नियमित मालिका लेखन करणाऱ्या लेखिका व चित्रकर्ती जयश्री दाणी यांची एक वेगळी मालिका सुरु करीत आहोत मालिकेचं शीर्षक आहे “चित्रोक्ती”. ही मालिका सोमवार व बुधवारी प्रकाशित होईल,आज या मालिकेच्या विषयाचा परिचय देत आहोत.
जयश्री मनापासून स्वागत !
+++++

(विषयाचा परिचय करून देणारे पत्र)

प्रिय वाचकवृंद

अश्मयुगीन मानवाने शिलाखंडावर रेघोट्या ओढत चित्रकलेचा पाया घातला. आदिमानवाने त्याकाळी निर्मिलेली भित्तिचित्रे अनन्यसाधारण आहेत. आदिमानवाची कला म्हणजे त्याच्या यातुविद्येमधील एक विधी होता. यातुविद्या म्हणजे प्रतिकूलतेतही मनगुंग होऊन जीवनकलहास तोंड देण्याची अध्यात्मविद्या. मानवी बुद्धिशक्तींना दुर्गम अशा शक्तिसिद्धी यातुविद्येतून मिळत असल्याने प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या या चित्रकिमयेशी मानव आदिम काळापासून जुळलेला आहे.

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमधली एक मुख्य कला म्हणजे चित्रयोग! चित्र म्हणजे शब्दांविना साधला, समजविला जाणार संवाद. चित्रकर्म म्हणजे असामान्य कृती व चित्रकर्मा म्हणजे चमत्कार करून दाखविणारा जादूगार किंवा कलावंत. तसेच चित्रोक्ती आणि चित्रकथालाप या शब्दांचे अर्थ म्हणजे अद्‌भुत कथा, सुसंवादी निरूपण असे होय. यातील सुसंवादित्व हीच सर्व कलेची अंगभूत प्रेरणा आहे.

रंग अथवा रंगद्रव्ये, लेखणी, कुंचला यांसारखी लेपनसाधने, रंगद्रव्यांच्या ग्रहण-प्रसरणासाठी लागणारी जल, तैल, गोंद, मेण यांसारखी ग्रहणद्रव्ये आणि लेपनासाठी आधारभूत चित्रफलक ही चित्राकृतीची प्रारंभिक माध्यम-साधने होत. भिंत, कापड, कागद, फळी अशी विविध वस्तुद्रव्ये चित्रफलक म्हणून वापरली जातात. गिलाव्यासाठी वापरलेले वस्तुद्रव्य, त्याची रंगग्रहणाची क्षमता यामुळे भित्तिचित्राच्या माध्यमाला मर्यादा पडतात. पण विपुल, सुरक्षित क्षेत्र आणि टिकाऊ स्थैर्य यांमुळे या मर्यादेतही जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतींनी हे माध्यम सुप्रतिष्ठित केलेले आहे. पुढे चित्रफलक म्हणून कागदाचा वापर होऊ लागल्याचे सर्वश्रुतच आहे.

कलावंताच्या मनावर दृश्य विश्वातील वस्तूंचा, विशेषतः त्यांच्या आकारांचा भावनात्मक परिणाम होतो. त्याच्या अंतर्यामी काहीएक भावगर्भ आकृती प्रदीप्त होते. आशय, माध्यम आणि अभिव्यक्तिप्रकार यांनुसार ती आकृती रेखाटल्या जाते. त्यासाठी तैलचित्र, जलरंगचित्र, मेणरंगचित्र, रंगशलाकाचित्र, चिक्कणितचित्र असे माध्यमप्रकार हाताळल्या जातात.

तंत्ररीती आणि व्यावहारिक उपयोजनेनुसार भित्तिचित्र, लघुचित्र, अलंकृतपट्ट असे प्रकार होतात. वस्तुनिष्ठ आशयानुसार व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, सागरचित्र, स्थिरवस्तुचित्र, ऐतिहासिक, पौराणिक, लोकघाटी वा प्रायिक चित्र असे प्रकार होतात. कलावंतांच्या कलाविषयक भूमिकांनुसार अभिजाततावाद, वास्तववाद, स्वच्छंदतावाद, दृक्‌प्रत्ययवाद, घनवाद, रंगभारवाद, दादावाद, अतिवास्तववाद, अभिव्यक्तिवाद, बिंदुवाद, नवकालवाद, अप्रतिरूप कला, क्रियाचित्रण, दृक्‌भ्रमकला, जनकला असे अनेक कलासंप्रदाय रूढ आहेत.

आदिम काळापासून दृश्य विश्वाबद्दल माणसाला कुतूहल वाटत आले आहे. हाताच्या तळव्याचे ठसे भिंतीवर उमटवून जणू त्याने आपल्या अस्तित्वाचा ठसा आपल्या निवासावर उमटविला. ही आदिम मुद्रिताकृती होय. अशा हस्तमुद्रितांनी भिंतीवर सजावट करण्याची प्रथा आजही आढळते. भिंतीवर टेकलेल्या तळव्याभोवती रंग फुंकून ऋणचित्र उमटविण्याचे कसबही मनुष्यप्राण्याने हस्तगत केले. रंग कमी जास्त पातळ करून त्याने उठावांची विविधता मिळविली.

हिंदू धर्मातील विष्णूधर्मोत्तर पुराणामध्ये भारतीय चित्रकलेचा स्रोत आहे. भारत, चीन आणि इजिप्त या देशात प्राचीन काळापासून चित्रकला अस्तीत्वात होती.

आधी पुराणातील विविध प्रसंगानुरूप चित्रे रेखाटली जाऊ लागली, त्यास पौराणिक चित्रकला म्हणतात. मध्ययुगीन चित्रकला, युरोपीय चित्रकला, वास्तवदर्शी कला, आशियायी चित्रकला असे चित्रकलेचे विविध प्रकार आहेत.

चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. राजा रवी वर्मा, रविंद्रनाथ टागोर, अवनिंद्रनाथ, अमृता शेरगिल, टर्नर, लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल अँजेलो, व्हॅन गॉग, हुसेन, हेब्बर, रझा, गायतोंडे, बि. प्रभा यांसह अनेक महान चित्रकार एेतिहासीक कालखंडात होऊन गेलेत. अशाच सुप्रसिद्ध चित्रकारांचा परिचय आपण या पत्रमालिकेद्वारे करणार आहोत.

आपली
जयश्री

 #तृष्णाभाग १०० डॉक,  ठरल्या दिवशी शाळेत पोहोचले, सकाळची शाळा आणि दुपारची अशा दोन शिफ्ट्स मध्ये असते त्यांची शाळा. शाळेच...
16/12/2019

#तृष्णा
भाग १००
डॉक,
ठरल्या दिवशी शाळेत पोहोचले, सकाळची शाळा आणि दुपारची अशा दोन शिफ्ट्स मध्ये असते त्यांची शाळा. शाळेचा परिसर खूप स्वच्छ , सुंदर फुलझाडं लावलेली,त्यांना असलेली विटांची किनार गेरूनी आणि चुन्यानी रंगवलेली होती, देखणी दिसत होती .खूप दिवसांनी कुठल्याही शाळेत पाउल ठेवलेलं. माझे शाळेचे दिवस ताजे झाले मनात,खूप झाडं होती आणि ग्राउंड विस्तीर्ण होतं आमचं.आमच्या शाळेत इतकी शिस्त नसायची, इतकी शांतता देखील नसायची, वर्गावर्गामध्ये चाललेली घोकंपट्टी किंवा दंगा ऐकू यायचा...इथे सारं फारंच शांत ...इतकं की ती शांतताच अंगावर येत होती....इथे आम्हाला रिसीव्ह करण्यापासून ते प्रीन्सिपलमॅमच्या रूममध्ये जाईपर्यंत दोन विद्यार्थी एसकॉर्ट करत होते, चालतांना देखील त्यांनी हात मागे घट्ट धरलेले विश्रामसारखे, खूप अद्बिनी ते आमच्याशी वागत होते. मात्र मला त्या अदबीमागे एक जबरदस्ती दिसत राहिली, या वयासाठी अनैसर्गिक वाटणारी शिस्त का कुणास ठावूक खटकलीच.येतांना दिसलेले डिस्प्ले बोर्ड्स खूप शिस्तीनी सजवलेले, त्यातूनही डोकवणारी शिस्त बघून मलाच कोंडवाड्यात आल्याचं फिलिंग आलं. शाळा चांगलीच आहे ही, आपणच जरा जास्त जजमेंटल होतोय वाटून मी मुद्दाम चांगलं काही शोधायला लागले. सारं निटनेटकं, आखीव रेखीव.शाळेतले बोर्डात आलेले विद्यार्थी दाखवणारा फलक, शाळेतल्या शिक्षकांची माहिती देणारा फलक, व्यवस्थापनाची माहिती , मिळालेली बक्षिसं हारीनी ,सौंदर्यपूर्ण तर्हेनी मांडून ठेवलेली ...
‘पवनला आम्ही श्रद्धांजली वाहिली काल,त्याच्या आईवडीलांनी मात्र आमच्या सांत्वनपर पत्राचा स्वीकार केला नाहीय. पवनचे वडील एम.एस.ई.बी.मध्ये इंजिनिअर आहेत, आई एका सरकारी ऑफिसात काम करते’.प्रीन्सिपलमॅम सांगत होत्या – ‘चला आपण ती जागा बघुयात’ ...म्हणून मला त्या त्यांच्या शाळेच्या मधल्या भागात घेऊन गेल्या, वर बघितलं तर जिने होते स्पायरल आणि त्यातून आभाळाचा एक तुकडा गोलाकार दिसत होता ‘शाळेचे चार माजले आहेत,सर्वात वरती फक्त असेम्ब्लीसाठी जागा आहे ,कधी कार्यक्रम असला तर जातो आम्ही , पवननी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली ...ह्या इथे’ ...त्या दाखवत होत्या ती जागा खडूनी मार्क केलेली होती. इतक्या उंचीवरून एका विद्यार्थ्यानी उडी मारायचं धाडस करणं याचं खरोखर आश्चर्यच वाटत राहिलं.त्या मनाची काय अवस्था असेल झालेली त्यावेळेस- नुसती कल्पनाच करू शकतो आपण .
डॉक ,त्या नंतर टीचर्सची मिटिंग घेतली.सगळेच भेदरलेले होते. काय बोलावं कळेना. मुळात पवनच्या बाबतीत जे घडलं ते त्यांच्या तोंडून ऐकायचं होतं.त्या पोलिसांनी पकडून नेलेल्या टीचरबद्दल देखील अधिक माहिती मिळवायची होती. आधी आत्महत्त्या का घडली याची कारणं देखील जाणून घ्यायची होती.अस्वस्थ कुजबुजीला तोंड फोडणं भाग होतं,मीच विचारलं ‘पवन चे क्लास टीचर कोण’? एक मध्यमवयीन शिक्षिका उभी झाली , ‘माझ्या वर्गात होता पवन’ ...तिच्या देहबोलीत अपराधभाव झळकत होता. ‘खरं सांगायचं तर तो कधी रडतांना दिसला नाही, कधी कुणाशी भांडायचा देखील नाही अत्यंत सरळमार्गी होता हो पवन, तो असं काही करील हे आमच्या स्वप्नात देखील आलं नाही कधी’ ...शिक्षिकेच्या आवाजात एक साधेपणा सच्चेपणा होता. ‘मग का घडलं हे?उगाच तर नववीमध्ये असलेला मुलगा जीव देणार नाही’ माझ्या प्रश्नावर परत एक जीवघेणी शांतता. तेव्हढ्यात प्रीन्सिपलमॅमनी एका विद्यार्थ्याला बोलावून आमच्या मिटिंगचे फोटो काढायला सांगितले त्यावर मी आक्षेप घेतला तरीही त्यांनी घेतलेच फोटो .‘आमच्या व्यवस्थापनाला हवे आहेत रेकोर्ड करता’त्या म्हणाल्या, या वाक्यावर मात्र मी उसळले‘मला तुम्ही खानापूर्ती करण्याकरता बोलावलंय का’? म्हणत मी उठले निघायला तशी त्या आर्जव करत म्हणाल्या ‘नाही हो,खरंच आम्हाला गरज वाटतेय आमच्यासाठी समुपदेशन हवंय...शाळेतल्या वातावरणाला नॉर्मलला आणायसाठी मदत हवीय ...यावर मी फक्त एव्हढंच बोलले ... ‘जर तुम्ही माझ्यापासून घटना लपवाल तर मी काहीही मदत करू शकणार नाही ...घटना घडून गेल्यावर नाकारण्यात अर्थ नसतो ...सगळे सहकार्य करणार असाल तर मी येईन मदत करायला’ तशी सगळे तयार झाले. मी त्यांना म्हंटलं ‘शिक्षिक मोठे आहेत, मला आधी विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे,तेही त्याच्या वर्गातल्या’सगळे एकमेकांकडे बघत होते शेवटी तयार झाले ‘आणि मी विद्यार्थ्यांशी एकटी बोलणार’ म्हंटलतर आमच्या तर्फे एक जण असेल म्हणाल्या प्रिन्सिपल ... मी नकार दिला त्याला ...मी एकटीच बोलणार ....म्हंटल्यावर त्या जरा नर्व्हस वाटल्या ...त्यांना मानण्याशिवाय पर्याय नव्हता ...आम्ही त्या वर्गाकडे निघालो ..
मानसी

 #तृष्णाभाग ९९ श्रीकांत ,   रुटीन कामं सुरु होती, येणाऱ्या नव्या पेशंट्सची हिस्ट्री घेत होते ओ. पी. डी. मधली ड्युटी होती...
11/12/2019

#तृष्णा
भाग ९९
श्रीकांत ,
रुटीन कामं सुरु होती, येणाऱ्या नव्या पेशंट्सची हिस्ट्री घेत होते ओ. पी. डी. मधली ड्युटी होती. थंड बोचऱ्या असतात मार्गशीर्ष महिन्यातल्या सकाळी आणि इथे हॉस्पिटलमध्ये तर उंच उंच झाडं त्यांची पानगळ सहन करत उभे असतात, गळलेल्या पानांचा कचरा मोठमोठ्या बांबू लावलेल्या खराट्यांनी झाडत सफाई कर्मचारी सफाई करताकरता आणखीनच धुरळा उडवतात, दूर बागेत निवासी पेशंट्स झाडांना पाणी घालत असतात, प्रार्थनेच्या हॉलमध्ये पेपर्स वाचणारे मनोरुग्ण, कुणी पेटीवर ‘केशवा माधवा’ म्हणत असतं ,काही पेशंट्स योगा करत असतात असं हॉस्पिटल दंग असतं आपआपल्या कामात. त्या दिवशीही उन्हाची तिरीप डोकावत होती खिडक्यांमधून आणि काम करता करता हवीशी ऊब चहाच्या ग्लासला हाती धरून मिळवत होते मी एकीकडे, तो मोबाईल खणखणला ...अपरिचित नंबर , मी बोलायला सुरवात केली, तिकडून ‘मी जाधव बोलतेय .’ एका प्रख्यात शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या जाधवबाई बोलत होत्या, ‘मला तुमचा नंबर ओळखीच्या व्यक्तींनी दिलाय’ म्हणाल्या ...पुढे म्हणाल्या .. ‘मॅडम एका महत्वाच्या कामासाठी मी तुम्हांला फोन केलाय आजचा पेपर वाचला का तुम्ही’? मी नाही म्हंटलं कारण रूमवर गेल्यावर मगच निवांत वाचू शकते पेपर्स रोजच.सकाळी अशक्य असतं वाचन .. तशी त्या म्हणाल्या ‘मॅडम, काल एक घटना घडली ज्याचा आम्हां सर्वांना खूप त्रास होतोय, त्या घटनेच्या संदर्भात आम्हांला तुमची तातडीनी मदत हवीय’, जरा दम लागल्या सारख्या, घाबऱ्या आवाजात त्या पुढे म्हणाल्या, ‘अहो, काल आमच्या शाळेत एका नववीच्या विद्यार्थ्यानी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली ... आम्ही सगळे म्हणजे -- विद्यार्थी, शिक्षक खूप घाबरलो आहोत त्या घटनेनी. पोलीस येऊन गेलेत. आमच्या शाळेतल्या एका शिक्षकांना घेऊन गेलेत कालपासून विचारपूस करायसाठी, अजून त्यांना सोडलेलं नाही, वर्तमानपत्रांनी आणि एकूणच मेडीयानी आम्हांला भंडावून सोडलंय, आम्हीच आरोपी असल्यासारखं वागताहेत सगळे आणि विद्यार्थी तर ईतके घाबरले आहेत की आज निम्मे विद्यार्थी अनुपस्थित आहेत ,पालकांचे किती फोन्स,एकूण वातावरण पार बिघडलंय शाळेतलं. तुम्ही प्लीज जरा मदत करू शकाल का वातावरण नॉर्मल करायला’?
डॉक,...मी वैद्यकीय अधीक्षकांची परवानगी घेऊन त्यांना एक वेळ दिली,त्या गाडी पाठवते म्हणाल्या त्यादिवशी कारण शहराच्या बाहेर २० कि.मी वर आहे शाळा. रूमवर येऊन मी पेपर्स चाळले. सर्व पेपर्समध्ये हाच मथळा. एक नववी मधला म्हणजे साधारण पंधरा वर्षाचा मुलगा अशी भयंकर टोकाची कृती करतो हे किती शॉकींग ना? तसंही आत्महत्त्यां त्याही विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या खूप वाढल्या आहेत हे निर्विवाद,अगदी सांख्यकीय आकडे न बघणाऱ्या, वर्तमानपत्र नियमित वाचणाऱ्या कुणालाही हे सांगता येईल असं कटू सत्य ...मला ऐन उमेदीचा काळ असून का करतात विद्यार्थी आत्महत्त्या? आपल्या शिक्षणाची ही एक दारुण शोकांतिकाच म्हणायला हवी नाही? एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या आणि दुसरीकडे अजून पुरता विकासही न झालेल्या विद्यार्थ्यांच्या अशा स्वतःला समाप्त करण्याच्या अविचारी घटना समाजमन ढवळून काढतात. माझ्याच एम.फील.च्या संशोधनात असं लक्षात आलेलं की, प्रत्येक शाळेमध्ये कमीत कमी ३०% विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज असते आणि १०% विद्यार्थ्यांना मानसोपचाराची देखील गरज असते. त्यामुळे एक समुपदेशकाची पोस्ट प्रत्येक शाळेत अनिवार्य करावी ही सूचनापण दिली होती. पण लक्षात कोण घेतो? काही संशोधनावर आधारित सूचनांना केराची टोपली दाखवली जाते, काही सामाजिक संस्थांना केवळ कागदावर रहाणारे संशोधन करण्याकरता लाखोंनी अनुदान मिळते ...हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषयच आहे ...असो.
ज्यानी आत्महत्त्या केली तो पवन.त्याचे जमिनीवर पडून रक्तस्त्राव होत आहे असे फोटो वर्तमानपत्रांनी छापले,हृदय पिळवटून निघेल असं दृश्य, त्याच्या आईवडिलांचा आक्रोश वृत्त वाहीन्या भावनाशून्य पद्धतीने दाखवत राहिल्या बातम्यांमध्ये .मी काही महत्वाची माहिती मिळतेय का ते शोधत होते त्यात..,
मानसी

 #तृष्णाभाग ९८ श्रीकांत , मला बरेचदा प्रश्न विचारला जातो की समुपदेशनानी किती फायदा होतो? मधेच पेशंट स्लीप नाही होत का पर...
09/12/2019

#तृष्णा

भाग ९८
श्रीकांत ,
मला बरेचदा प्रश्न विचारला जातो की समुपदेशनानी किती फायदा होतो? मधेच पेशंट स्लीप नाही होत का परत आजारात? समुपदेशन ही एक प्रक्रिया आहे हे अशा व्यक्तींना समजावून द्यावं लागतं , एका सेशन मध्ये जादू झाली आणि पेशंट पूर्ण बरा झाला असं फारच क्वचित घडतं ,बाकी बहुतेकांना त्यांच्या वागण्यातले दोष दाखवून देत देत त्यात कशी सुधारणा करायची या संबंधी सतत इनपुट्स द्यावे लागतात. वैवाहिक समुपदेशनामध्ये तर दोघांनाही वेगवेगळं तर बरेचदा एकत्रही समुपदेशन करावं लागतं.जेंव्हा पिडीत व्यक्ती ही अत्याचाराची बळी असते तेंव्हा तिला तर हे सारं विसरण्यासाठी विशेष मदत लागते, मानसोपचार लागतात. त्या आघाताचा काय परिणाम झालाय,किती तीव्र लक्षणं आहेत यावर वेगळ्याने बोलावं लागतं ... अपर्णाच्या केस मध्ये बरीच सुधारणा दिसून आली त्याचं प्रमुख कारण औषधोपचार, मध्येच न सोडता पूर्ण समुपदेशन आणि घरच्यांचा आधार हेच होतं , अजूनही अपर्णा संपर्कात असते, तिनीच आग्रह केल्यावरून तिच्या सारख्या असंख्य मुलींकरता एक छोटं आवाहन करावंसं वाटतं, इथे देतेय, तुमचं मत सांगा त्यावर ...
“प्रिय सख्यांनो ,
मला कल्पना आहे तुम्हांला आलेल्या अनुभवांची , माहितीय त्याची होरपळ किती भयानक असते ती,त्या अत्याचारासाठी जबाबबदार असणाऱ्या व्यक्ती जेंव्हा जवळच्याच असतात तेंव्हा तक्रार तर दूरच पण त्या संदर्भात उच्चार देखील करायला भीती, संकोच वाटत असतो, कारण आपल्याच अत्यंत जवळच्या व्यक्तिंना हे समजलं तर काय वाटेल? याची चिंता आपण करत असतो, संपूर्ण प्रकरणाची शरम वाटत असते ...पण शरम तुम्हांला नाही, त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला वाटली पाहिजे नाही का? या बद्दल आपण कितीतरी वेळा वेगवेगळ्या माध्यमातून विचार झालेला बघतो मात्र स्वतःच्या बाबतीत ओठ मिटून चूप बसतो, अशा चूप बसण्यानेच आरोपींचं मनोबल वाढतं, तुम्ही पिंक बघितला असेलच किंवा ‘सत्यमेव जयते’चा या विषयावरचा भाग देखील बघितला असेल ...मुद्दा हा आहे की अशा अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे, अजाण वयातल्या मुलींवर देखील असे प्रसंग येतात ...त्या बद्दल त्यांनी विश्वासपात्र व्यक्तीशी बोलायला हवं. POCSO (Prevention of children from sexual offence Act ) Nirbhaya Act या मधल्या कायद्यांच्या तरतुदींची माहिती जास्तीत जास्त स्त्रियांना द्यायला हवी . प्रतिबंधात्मक तर खूप काही करायला हवंच आहे मात्र ज्यांना अशा अत्याचाराला तोंड द्यावं लागलं अशांसाठी त्या आघाताला कसं तोंड द्यायचं यासाठी मानसिक आधार केंद्र देखील निघायला हवीत.
खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त वाईट वाटत असतं ते आपला गैरफायदा घेतला गेला याचं, आणि ज्या नात्यावर विश्वास ठेवायचा त्याच नात्यांनी गैरफायदा घेतला तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो त्यांना. दुसरीकडे अजूनही स्त्री ची अब्रू ही ‘काचेचं भांडं’ वगैरे समजणारा एक मोठा वर्ग आहे ...पण सुशिक्षित मुलींनी तरी त्यातून मनानी बाहेर पडायसाठी विशेष प्रयत्न करायलाच हवेत. सतत एक “बळी” असल्याची भावना मनात ठेवणं मानसिक आरोग्यासाठी खूप घातक आहे, त्यातून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. सख्यांनो वाईट वाटेल तुम्हांला पण तरीही सांगायलाच हवं आहे की आहे आपल्यावर फार मोठा अन्याय झालाय अशा वृत्तीला आपणच गोंजारत राहिलो महिनोंमहिने, वर्षानुवर्ष, खतपाणी घालत राहिलो, सतत तेच तेच आठवत राहिलो तर त्यातून न्यूनगंडाचं रोपच तरारणार . निपटून काढायला हवीय अशी बुळी मानसिकता , सतत रडणं , सतत चिडचिड करण्यापेक्षा समुपदेशनातून त्यावर मोकळं कसं होता येईल ते बघा. आरोपींना योग्य शिक्षा व्हायला हवीच पण आपण ही दक्षता घ्यायला हवीच असे प्रसंग घडूच नये म्हणून ..., आपल्या वागण्या मुळे ,रहाणीमानामुळे हे घडतं असं मला अजिबात नाही म्हणायचं, एक समुपदेशक म्हणून मला वाटतं की अशा घटनेनंतरची जी निराशेची गर्ता त्या युवतीला सतत दिसते ती तुम्हाला दिसायला नकोय , नका मानू स्वतःला जबाबदार या सर्वासाठी , जबाबदारी घ्यायचीच असेल तर ती आपल्या स्वस्थ मनाची , आरोग्यपूर्ण जीवनाची घ्या ...पुढे चलायला हवंय ...
खूप जण आहेत मदत करू शकणारे , मात्र “सिक रोल” घेऊ नका , आणि हो मदतीसाठी हाक द्यायला विसरू नका .....आम्ही आहोत ...
तुमची
मानसी”

 #तृष्णाभाग ९७ डॉकअपर्णाच्या केसनी खूप वेळ घेतला, पण खूप सारे कंगोरे हाताळता आले , कोणत्याही केस मध्ये असं वेगवेगळ्या बा...
07/12/2019

#तृष्णा
भाग ९७
डॉक
अपर्णाच्या केसनी खूप वेळ घेतला, पण खूप सारे कंगोरे हाताळता आले , कोणत्याही केस मध्ये असं वेगवेगळ्या बाजूनी विचार करून काम करायला खूप मजा येते. आता जे लिहितेय ते म्हणजे अपर्णाच्या केसचा उत्तरार्ध. तिच्या जिजाजींना एकट्याला बोलावलं होतं आधी, त्या माणसाशी अपर्णाच्या बहिणीचं लग्न झालेलं,मात्र व्यक्ती एकदम रंगीन मिजाजवाला वाटला, पान खातखात बोलायला लागला तेंव्हा आधी त्याला ‘पान पूर्ण खाऊन मग आत या’ सांगून बाहेर पाठवलं , तो बाहेर जाऊन पचकन पान थुंकून आला. त्याला भीती होतीच जरा पण तरीही बेरडा सारखं त्यानी विचारलं ‘काय म्हणतेय आमची अपर्णा’? यावर मी फक्त म्हंटल ‘आमची म्हणजे’? तशी हसत माणूस म्हणतो म्हणजे ‘साळी, माझी ...’
यावर मी काहीही न बोलता एक मोठा विश्राम घेतला, त्यांना त्यानंतर सरळ म्हंटलं, ‘अपर्णानी तुमच्या बद्दल मला सगळं सांगितलंय’ यावर डिफेन्सिव्ह होत तो माणूस म्हणाला, ‘आम्हाला तिला त्या आश्रमात न्यावं लागलं कारण ती वागतच होती विचित्र...’, ‘अपर्णा अशी का वागत असेल काही अंदाज आहे का तुम्हांला?’ यावर माणूस म्हणाला,‘कशी असेल कल्पना मला? फक्त एव्ह्ढच माहित आहे की ती शिक्षण घेत होती तेंव्हा पासून तिची लफडी होती ...,’ ‘लफडी? तिची? ...आणि तुम्ही वागलात ते काय होतं ...’? यावर माझ्याकडे रोखून बघत तो म्हणाला ‘मी काय वागलो तिच्याशी वाईट? उलट तिचं लग्न जमवलं , लग्नाची सारी उठाठेव केली ...चांगल्याचा जमानाच नाही राहिला ...’ आता मात्र हद्द झाली होती त्याच्या वेड पांघरून पेडगावला जाण्याची, मी शेवटी जरा आवाज चढवूनच बोलले . ‘तुम्ही मुकाट्याने सरळ बोला , काय काय झालंय ते सर्व मला माहित आहे ..तुमच्यावर फसवणुकीचा आरोप आणि बळजबरीच्या संदर्भात केस होऊ शकते याची तुम्हांला कल्पना आहे का?पोलीसस्टेशन मध्ये तुमच्या विरुद्ध तक्रार केली जाऊ शकते हे माहितीय का तुम्हाला?तुमच्या पत्नीला तुमच्या वागण्याचा संशय नाहीय हा कदाचित तिचा मोठेपणा असेल किंवा डोळेझाक करण्यावाचून तिला पर्याय नसेल ...पण याचा अर्थ तुम्ही अजूनही अपर्णाला त्रास देऊ शकता असा नाही.तिला आधी खूप त्रास दिलाय तुम्ही ,आता तिला तिच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता जगू द्या नाही तर आम्ही हॉस्पिटल कडूनच करू तक्रार अत्याचाराची ..’
माझ्या कडे आ वासून बघतच राहिले अपर्णाचे जिजाजी, मात्र नंतर हा निगरगट्ट माणूस म्हणतो ‘अहो ताई तिला काहीही बोलायची सवय आहे अश्लील , नका ठेवू तुम्ही विश्वास तिच्यावर पार वेडी आहे ती काहीही बोलते , तिच्या कॉलेजमध्ये तीच तिच्या सरांच्या मागे लागायची, भेटला तो मला म्हणून मला कळलं, मी म्हणून चूप बसलो ,एखादा असता तर आयुष्यातून उठली असती अपर्णा, मी चूप बसलो सर्व ऐकूनही .......’ ... “चूप बसलात की तिचा गैरफायदा घेतला हे फिर्याद केली की लक्षात येईलच, अपर्णाच्या अशा मन:स्थितीला तुम्ही देखील खूप जबाबदार आहात ..तुम्ही अपर्णाशी ठीक वागलात तर काही होणार नाही, मी अपर्णाला एक एक महिन्याने फॉलोअप करता बोलावणार आहे , त्यामुळे मला नक्कीच कळेल तुम्ही कसे वागताय ते ..नाही तर मला नाईलाजाने तुमच्या पत्नीला आणि अपर्णाच्या नवऱ्याला या गोष्टींची कल्पना द्यावी लागेल” यावर निरुत्तर झाला तो माणूस, ‘नीट वागेन , मध्ये पडणार नाही’ असं कबुल तर केलं पण खरोखर तसा वागणारे का हा माणूस ते बघावं लागणार होतं शिवाय अपर्णा आणि तिच्या नवऱ्याचं देखील नीट पटायला हवं होतं ...त्यांना दोघांना एक महिन्यानंतरची वेळ दिली.
काही वेळेला मानसिक रूग्णांपेक्षा अशा जिजाजीं सारख्या गुन्हेगार माणसांनाच सर्वात जास्त उपचारांची गरज आहे असं वाटतं ... स्त्री अजूनही घराबाहेर काय किंवा घरात ही किती vulnerable आहे, किती पटकन तिचा गैरफायदा घेतात लोक ...
"खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले खुदा बन्दे से खुद पूछे के बता तेरी रज़ा क्या है”हे व्हायला हवं, महिला सक्षमीकरणात मानसिक सक्षमीकरण हा महत्वाचाच घटक आहे नाही, डॉक?

मानसी

 #तृष्णा भाग ९६ श्रीकांत , अपर्णाच्या केस बद्दल विचार करते तेंव्हा वाटतं मानवी आयुष्य किती व्यामिश्र अनुभवांनी घडत जातं ...
06/12/2019

#तृष्णा
भाग ९६
श्रीकांत ,
अपर्णाच्या केस बद्दल विचार करते तेंव्हा वाटतं मानवी आयुष्य किती व्यामिश्र अनुभवांनी घडत जातं नाही? एका वागण्याची सावली दुसऱ्या वागण्यावर पडत जाते,एका निर्णयातून दुसऱ्या वागण्याची रुजवात होत जाते. आपल्याला जर हे सारं आधीच कळलं असतं तर हे घडलंच नसतं असं वाटतं खरं, पण ते कळण्यासाठी आधी आपल्या मनाची काय तयारी करून घ्यायला हवी ते मात्र आपल्याला नाही आपल्या पालकांना कळायला हवं असतं. अपर्णाच्या आईवडिलांचं वागणं बरंचसं चुकलं होतं, त्यांनी दोघींमध्ये जी तुलना केली त्यातून ईर्ष्या निर्माण झाली, अपर्णानी तिच्या बाबतीत जे घडतंय ते त्यांना सांगावं इतका विश्वास ते कधीच निर्माण करू शकले नाहीत हे फार दुर्दैवी होतं. अपर्णाने देखील जेंव्हा ठामपणे नाही म्हणायला हवं होतं तेंव्हातेंव्हा आत्मविश्वास नसल्याने ब्र देखील उच्चारला नाही.
डॉक , मी जेंव्हाही अत्याचार,बलात्कार वगैरे बद्दल विचार करते तेंव्हा तेंव्हा मला त्याला बळी पडलेल्यांना एक सांगावसं वाटतं ...लैंगिक अत्याचार, बलात्कारातून मनानी बाहेर पाडायला हवं असतं, आपल्याला या घटनेकडे एक अपघात म्हणून बघायला हवं ,स्वतःची चूक नसतांना असं घडत असेल तर अर्थातच दोष आपल्या समाजाचा, यंत्रणांचा, आपल्या कुटुंबाचा देखील असू शकेलच, पिडीत व्यक्तीने मात्र त्यातच अडकून पडू नये. आयुष्यात बाकी बरंच काही सुंदर घडू शकतं , प्रत्येक दिवस वेगळा असणारच या आत्मविश्वासानी पुढे जायला लागेल नाही का? अर्थात this is better said than done! देह आणि मन यांच्यात श्रेष्ठ आपण मनाला मानत असू तरच यातून बाहेर पडायचे मार्ग देखील खुले होतील, जर आपलं ‘शरीर म्हणजेच शील,काचेचं भांडं’ वगैरे दकियानुसी विचारांची जळमटं आपण जोपासत राहिलो तर केवळ आणि केवळ अवसाद / निराशेच्या दरीत कोसळत राहू, नाही? गेलेला दिवस संपला आहे , भविष्याची चिंता करत बसलो तर आज हाती असलेला सोन्याचा क्षण देखील आपण वाया घालवू हे अशांना सतत सांगत बसावं लागतं. खूपखूप जणी आहेत अशा, अगदी कोवळ्या वयात घरच्याच कुठल्या तरी नाराधमानी अत्याचार केलेल्या, डॉक, खूप वाईट वाटतं जेंव्हा त्या अशा धक्क्यांमधून सावरत नाहीत आयुष्यभर तेंव्हा. आपल्या सो कॉल्ड समाजाने देखील या बद्दल फार संवेदनशील असायला हवंय ...अत्याचारांबद्दल zero tolerance असायला हवा, त्यासाठी नियम कठोर हवेत वगैरे सर्व मान्य पण अशा कोवळ्या जीवांना आधार देखील हवेत ना? एका मनाचा खून करत असते असा अत्याचार करणारी व्यक्ती, तिच्यावर हत्त्येचाच आरोप ठेवला पाहिजे असं ही वाटत रहातं ... असो, मी इथे पत्रातून व्यक्त होतांनाच असं भावानिक होण्याचं स्वातंत्र्य घेत असते ...प्रत्यक्षात मात्र असं क्वचित व्यक्त करते.
अभयच्या बाबतीत सांगायचं तर तो एक ‘टिपिकल’ पुरुष होता,ज्याला सेक्स हे रात्री, अंधारात ‘उरकायची’ गोष्ट वाटायची,स्त्री ने पुढाकार घेणं त्याला अतर्क्य वाटायचं त्यातून ती आक्रामक असल्याने तो विझत असावा, त्याच्या चुकीच्या कल्पनांना खोडून काढावं लागलं, कारण एकीकडे तो ‘ते’आटोपायच्या मागे असायचा आणि अपर्णा मागच्या अनुभवांनी वेगळ्याच अपेक्षा ठेवून असायची , फोर प्ले वगैरे बद्दल अभय अनभिज्ञ होता. एकमेकांना समजावून घेत पुढे जायला हवं हे त्यांना पटवून द्यावं लागलं.
अपर्णाच्या पूर्व आयुष्याबद्दल अभयला, तिच्या नातलगांना सगळं सांगायचं की नाही हा एक मोठा प्रश्नच होता ,अपर्णाशी बोलल्यानंतर सध्यातरी त्याबद्दल काहीच वाच्यता करू नये असं आमचं दोघींचं ठरलं, मात्र एक पेच तरीही होताच तो म्हणजे जिजाजी ... अपर्णाच्या मनात त्यांच्या बद्दल अजूनही राग धुमसत होताच जो नैसर्गिकच होता ..त्यांना देखील समजून सांगावं लागणार होतंच ...अपर्णा बोलू शकणार नव्हती, तिच्या बहिणीला कळायला नको होतं,पालकांना कल्पना नव्हती ...पुढे जिजाजीनी तिला त्रास द्यायला नको होता.
डॉक, समाजकार्यकर्ता,समुपदेशक यांना किती किती पातळींवरून हस्तक्षेप करावा लागतो ना केसेसच्या भल्यासाठी .. पुढे काय तेही सांगतेच ...
इथे खूप पावसाळी किडे जमा होताहेत दिव्याभोवती ..पाऊस पडणार असेल .. या अवेळी पावसाचा राग येतो मला .. ना धड थंडी ना पावसाळा, एकूणच ...अवेळी ...मग ते काहीही असो वाताहत करतं नाही?
मानसी

 #तृष्णाभाग ९५ डॉक्टर , डॉक,मी इंटरनेट वरून माहिती काढली,खरोखर या नावाचे भगवंत /महाराज होते,आणि त्यांच्या बरोबर एक अम्मा...
05/12/2019

#तृष्णा
भाग ९५
डॉक्टर ,
डॉक,मी इंटरनेट वरून माहिती काढली,खरोखर या नावाचे भगवंत /महाराज होते,आणि त्यांच्या बरोबर एक अम्मा देखील असायच्या! त्यांनी स्वतःला कल्की अवतार घोषित करून घेतलं होतं आणि त्या अम्मा म्हणजेच बहुतेक ती दासी असावी ...केव्हढी गडगंज संपत्ती कमावली होती दोघांनी मिळून ..किती तरी एकर जागा ,कितीतरी मंदिरं, कितीतरी संस्थांचा कारभार होता त्यांचा ,एका टी.व्ही.च्यानल वरून त्यांचा भोंदूपणा एक्स्पोज केला गेला होता. चकाचौंध असली की सामान्य माणूस फशी पडलाच म्हणून समजावं! त्यांना काही महिन्यांपूर्वीच भोंदुगिरी,फसवणूक लुबाडणे ,लैंगिक अत्याचार करणे यासाठी अटक झालेली होती असं ती बातमी सांगत होती .
ही माहिती अपर्णालापण सांगितली. अशा बाबा लोकांचं फारच फावतं जेंव्हा असे न्युरोटीक पेशंट्स त्यांच्याकडे जातात तेंव्हा, अपर्णाला देखील “सजेसन्स”/ सूचना देऊनदेऊन कामं करवून घ्यायचे ते, ज्याला आपण संमोहन म्हणतो ते दुसरं तिसरं काही नाहीय केवळ सूचनांना पाळणं असतं हे आपण शिकलो. अशा केसेस या फार पटकन कुणाच्याही सूचना ग्रहण करतात त्यांची सूचनवशता खूप जास्त असते ! असो . हे सगळं अपर्णाला सांगितलं समजावून, तिच्यात जरा बदल जाणवत होता ,तिचं अस्वस्थतादर्शक वागणं जरा कमी झालेलं होतं, नवरा तिच्या माहेरी चक्क मुक्काम ठोकून होता, ज्यामुळे दोघांना नव्याने नातं सुरु करायला मदत होत होती हे महत्वाचं.
अपर्णाला आत्तापर्यंत असं मनापासून प्रेम करणारं माणूस नव्हतं मिळालेलं , त्यामुळे देखील ती जरा शांत झाली असावी. डॉक, एखाद्या व्यक्तीपासून कुणी दूर पळावं मात्र ती व्यक्ती जेंव्हा सतत असोशीने समजून घेण्याचा प्रयत्न करते तेंव्हा तिला असलेला विरोध देखील हळूहळू मावळायला लागतो हे घडतांना बघणं रोम्यांटीक असतं नै? अभयच्या आईचं खरोखर कौतुकच की ती दोघांना मोकळं ,एकटं रहाता यावं म्हणून या वेळेस मुलीकडे सहा महिने रहायला जाणार होती, अर्थात हे आधीच व्हायला हवं होतं लग्न झाल्याझाल्या .पण ‘देर आए दुरुस्त आए’ म्हणता येईल. एकएक गाठ सुटत जाते तशी पेशंट्सचे चेहरे खुलायला लागतात, अपर्णा जरा स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देत होती, तिचं वेगळं समुपदेशन करून तिला मागचं विसरून पुढे जाणं किती आवश्यक आहे , ते कसं करता येतं यावर काही इनपुट्स दिले, माहेरच्यांना देखील अपर्णाला समजून घ्यायला हवंय, औषधांनी यावर उपाय करता येतो हे पटलं. सारखा भूतकाळ उगाळत राहिल्यानी भविष्य देखील खराब होतं हा गोल्डन रूल समजावून द्यावा लागतोच बहुतेक पेशंट्स ना. सगळ्यात महत्वाचे होते ते सेक्सोलॉजीस्ट कडचे सेशन्स , त्यांना अपर्णाची पार्श्वभूमी माहित नव्हती , अभय च्या प्रोब्लेम बद्दल उपचार करतांना एकट्याने समस्या सुटणार नव्हती , आम्ही एक जोईंट सेशन घेतलं म्हणजे आम्ही दोघंतज्ञ आणि ती दोघं , अपर्णाच्या इतिहासाबद्दल डॉक्टर ना हिंट्स देत देत दोघांनी एकमेकांशी लैंगिक संबंधांच्या संदर्भात कसं वागलं पाहिजे हे आम्ही सविस्तर समजावून सांगितलं. मला ‘मास्टर्स आणि जॉन्सन’ ची पुस्तकं आठवत होती ...
अपर्णा ,लैंगिक अनुभवां बद्दल नकारात्मक झाली होती, जे सहाजिकच होतं , पुरुष म्हणजे केवळ ‘लैंगिक भूक असलेलं जनावर’ हा तिच्या डोक्यातला अर्थ पुसून एक मानवी चेहरा असलेलं प्रेम तिला सामोरं येत होतं आणि ती ते न ओळखता दूर पळत होती ..हे तिला उलगडून सांगितलं तेंव्हा तिचे डोळे अविश्वासानी झरायला लागले, डॉक ....ती माझा हात पकडून बसून राहिली कित्येक वेळ ...
मग दोघांनाही परत नव्याने नातं कसं फुलवायचं या बद्दल टिप्स दिल्या .. डॉक ,मी हे सर्व मोकळेपणानी लिहू शकतेय पत्रात हे किती महत्वाचं आहे ना ?... कुणाशी तरी बोलायचं असतं ट्रीटमेन्ट बद्दल. डॉक, लैंगिक जीवनाकडे किती दुर्लक्ष असतं जोडप्यांच ...हे जाणवलं अभयअपर्णाशी बोलतांना .......लिहिते पुढे ...
मानसी

 #तृष्णाभाग ९४ डॉक्, माझ्या समोर दोघं ही बसलेले अपर्णा आणि तिचा नवरा. तिच्या नवऱ्याचं नाव संजय. संजय वर अपर्णानी केलेले ...
04/12/2019

#तृष्णा
भाग ९४
डॉक्,
माझ्या समोर दोघं ही बसलेले अपर्णा आणि तिचा नवरा. तिच्या नवऱ्याचं नाव संजय. संजय वर अपर्णानी केलेले आरोप आणि त्यावर त्याची उत्तरं असं हे सेशन असणार होतं, म्हणून त्यालाच पहिला प्रश्न विचारला ‘संजय सुरवातीपासून एकमेकांशी तुमचं ट्युनिंग जमलंच नव्हतं म्हणता, काय कारणं होती तुमच्या मते’? त्यानी सांगायला सुरवात केली ‘ताई ..,’ म्हणत पुढे काही शब्द उच्चारण्याआधीच अपर्णा बोलायला लागली “हे काय सांगतील ताई मीच सांगते,यांनी माझ्यावर पाळत ठेवली आहे ,मी घरी असते म्हणून माझ्यावर वॉच ठेवायला क्यामेरा लावलाय घरात,हा आणि याची आई XX माझ्यावर वॉच ठेवतात, मी काय करते यांना बरोबर कळतं आधीच आणि माझ्या डोक्यातून सगळं चोरून घेतात ते ...” मी तिला शांत बसायची खूण केली,परत संजयशी बोलायला लागले की तुमच्यात शारीरिक संबंध आहेत का? यावर संजय म्हणाला, “ताई ही ना जवळ येऊ देत ना स्पर्श करू देत , कधी अंग चोरते ,कधी डोक्यावरून घट्ट पांघरून घेऊन झोपून जाते,एकदोनदा प्रयत्न केला तेंव्हा हिचा प्रतिसाद नसल्याने तिला खूप त्रास झाला आणि ती जे मागते त्याची मला किळस येते, तिला जे हवं ते माणसासारखा माणूस असून मला करावं नाही वाटत ,जनावरांसारखं वाटतं ते सगळं ... आणि हळुवारपणा नाहीये ताई हिच्यात, घाई असते सगळी ,ओरबाडून काढते ती मला ..... ...एक स्त्री अशी कशी वागू शकते? पण मी तिला माफ करतो त्याबद्दल मात्र कधी कधी अती होतं त्या वेळेला मला देखील माझे पर्याय निवडण्याखेरीज इलाज नसतो’. यावर थंडपणे अपर्णा म्हणाली ‘ताई यांना इरेकशनच येत नाही मी काय करू? माणसात नसलेल्या नपुंसक व्यक्तीबरोबर मी कशी काढू दिवस?आणि एकदा तर....जाऊ दे ..माझ्याही काही अपेक्षा आहेत ना’ ...ती रडायला लागली, ‘मला महाराजांनी सांगितलं होतं महिन्यातून एकदा तरी भेटायला यायचं,पण हे लोकं तिथेही जाऊ देत नाहीत, म्हणूनच माझ्या मागे त्या साउथ मधल्या कल्की भगवानांनी एक दासी सोडलीय, ती मला म्हणते , मला तुझ्यातली अच्छाई देऊन टाक माझी घाण तू घे ........माझ्याकडून ती आणि महाराज काम करवतात, महाराज मला समाधान देतात पण ती माझ्यावर जळते आणि मला वाईट काम करायला लावते, मला शिव्या द्यायला लावते आरडाओरडा करायला लावते, माझी अच्छी वागण्याची तऱ्हा तिनी चोरलीय ...’
अपर्णाच्या बाबतीत तिच्या ओ.सी.डी.मुळे ती उद्दीपित व्हायची,मात्र आधीच्या अनुभवां सारखीच अपेक्षा करत असल्याने तिला निराशा यायची, त्यातूनही घाई केल्याने संजयला समस्या निर्माण झाली होती ...यावर उपाय म्हणजे दोघांनी एकमेकाला सांभाळत लैंगिक व्यवहार करणं गरजेचं आहे,अपर्णानी घायकुतीला येऊन चालणार नाही हे तिला समजावून सांगावं लागलं, संजयला सेक्सोलॉजीस्टकडे रेफर केलं.अपर्णाला औषध घेणं अत्यावश्यक होतं, जरा झोप झाल्याने ती थोडी शांत झाली होती, तिला जाणवणाऱ्या सततच्या उत्तेजनाचं कारण मेंदूच्या कार्यात होतं हे दोघांनाही समजून सांगितलं. अपर्णाला अशा वेळेला दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देत स्वतःला डायव्हर्ट करायला सांगितलं,तिची गिल्ट कमी होण्यासाठी तिने महाराजांकडे जाणं अजिबात गरजेचं नाही हे समजावलं, त्यांच्या दासीबद्दलचा भ्रम देखील दूर करावा लागला अनेक उदाहरणं देऊन ..आता त्यांना सेक्सोलॉजिस्टकडे जाऊन साधारण पंधरा दिवसांनी परत बोलावलं , एकमेकाला सांभाळून घ्यायची जबाबदारी दोघांचीही आहे हे सांगतांना अपर्णाला खास करून काय बदल हवेत त्याची आठवण करून द्यावी लागली , तिच्या मनातल्या नवरा आणि सासू बद्दलच्या संशयाला दूर करायचं होतं ...अजूनही काही महत्वाच्या बाबीचा खुलासा करायचा होताच ....अपर्णा जे सांगत होती त्या बद्दल शहानिशा करायचा होता .
मला राहून राहून संजय सारखे किती तरी पुरुष आठवले ज्यांना performance anxiety , आक्रामक जीवनसाथीमुळे लैंगिक संबंधांमध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या ...दुर्दैव हे की त्यातून ते माणूस नसल्याचे,तो नपुंसक असल्याचे चुकीचे अर्थ काढले जातात..किती तरी लग्न अशी पहिल्याच महिन्यात तुटतात. अपर्णाच्या आधीच्या लैंगिक अनुभवांमधून तिच्या नकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या हे देखील बदलायचं होतं.
किती गंमत असते ना डॉक वैवाहिक समुपदेशनात, दोघंही आपआपल्या जागी तार्किक वागत असतात मात्र त्यांचं नातं फुलत नाही कारण दोघांमध्ये प्रीतीचे भावबंधच निर्माण झालेले नसतात, त्यांना त्यांचं नातं जोपासायला शिकवणं हा समुपदेशनाचा केंद्रबिंदू असतो ... ते दुरुस्त व्हायला हवं असतं जे जराश्या वागणुकीतल्या बदलांनी सहज शक्य असतं ...मात्र जोडपी त्याला ‘इगो पॉइंट’ करतात आणि नाती ......गोती बनतात.

मानसी

 #तृष्णाभाग ९३ डॉक्टर , शेवटी खूप पुस्तकं वाचली रेफरन्सेस शोधले , सापडलं एकदाचं अशा केसचं विश्लेषण कसं करायचं ते. अपर्णा...
03/12/2019

#तृष्णा
भाग ९३
डॉक्टर ,
शेवटी खूप पुस्तकं वाचली रेफरन्सेस शोधले , सापडलं एकदाचं अशा केसचं विश्लेषण कसं करायचं ते. अपर्णा ही OCD ची पेशंट होती , हा anxiety शी संबंधित आजार ! तिच्या डोक्यात जे विचार यायचे ते तिला विचारले नंतरच्या भेटीत, तर तिने सांगितलं की “मी मला सतत ओरल सेक्स करतेय असं वाटत रहातं, आणि त्या नंतर मला तशी भावना उद्दीपित झाल्यासारखं वाटत रहातं, मला कधी कधी आधीचे सर आणि इतर लोकं आठवतात ,त्यांनी जबरदस्ती करून घेतलेले प्रकार आठवतात , कधी मी हस्तमैथुन करून हे थैमान शमवते, कधी तेच कुणी सांगतात काही करायला,येतात ऐकू त्यांचे आवाज...नवऱ्याच्या बाबतीत मला खूप टेन्शन येतं , त्याला ओरल सेक्स माहित नाहीय, तो नपुंसक आहे .....पण मी त्याला काहीच सांगितलेलं नाहीय तो खूप चांगला आहे , मी त्याला फसवू नाही शकत ....... महाराजांनी मला सांगितलंय की मी ‘त्यांचीच’ स्त्री आहे , आणि त्यांच्याशीच हे संबंध ठेवले पाहिजेत, इतरांशी नाही, त्यामुळे ......मला केंव्हाही कुठेही महाराज आठवतात ....मला ओटीपोटात काही तरी होतं .........मग मला रूम मध्ये बंद करून घ्यावंच लागतं ...ते जे सांगतात ते सर्व लोकांसमोर थोडीच करू शकणार मी ........”
किती भयंकर होतं हे सगळं, एकीकडे मनात मंत्रचळ लागल्यागत केवळ सेक्सचे विचार यायचे आणि दुसरीकडे त्या बद्दलचा अपराधभाव. डॉक्टर यातला सर्वात वाईट भाग सांगू? घरच्यांना तिच्या कोणत्याच विचारांचा थांगपत्ता नव्हता आणि आईवडील म्हणायला लागले होते की अपर्णा मुद्दाम अशी दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी वागत असते. यामध्ये महत्वाचं होतं ते घरच्यांना समजावणं की तिचं वागणं हे तिच्या मेंदूतल्या केंद्रांच्या ताब्यात होतं , असे सेक्स संबधीचे विचार मनात येणं हे काही पाप नाहीय हे अपर्णाला समजून सांगावं लागलं, ज्या धारणेतून ती देवा समोर नाक घासत असायची , स्वतःला मारत असायची ....तिची तयारी वेगळ्यानी करून घ्यावी लागली की असे विचार मनातून कसे झटकून टाकायचे , तिला काही तंत्र, टेक्निक्स सांगितले , शिवाय औषधांचा मारा होताच. अपर्णाच्या मनात खूप खोलवर डिप्रेशन होतं. असंख्य वेळेला ठेवाव्या लागलेल्या अनैतिक संबंधांमुळे आत्मविश्वास आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मान डळमळीत झालेला ..धुळीला मिळालेला ..त्यातून बाहेर पडणं तिला कठीण होत होतं , ....
मात्र जेंव्हा तिला स्वीकारून प्रेम करणारा नवरा मिळाला तेंव्हा नेमकं त्याला नाकारण्यामागे तिची काय मानसिकता होती हे देखील उलगडून सांगावं लागणारच होतं तिला आणि इतरांना. डॉक, आठवतंय न्युरॉटीक या प्रकारातले जे आजार आपण शिकलो त्यात एक गुंतागुन्त आढळते ज्याला nerutotic paradox म्हणतात ...म्हणजे व्यक्तीला समजत असतं की आपण असं वागायला नको मात्र व्यक्ती तरीही नेमकी तशीच आत्मघातकी वागत जाते ...त्यातून मग त्यांच्या मनात संघर्ष निर्माण होत जातो आणि एक सतत मनात वसणारी दुश्चीन्ता (anxiety ) देखील त्यातून निर्माण होते ज्यामुळे व्यक्ती सतत ताणाखाली वावरत रहाते, ज्यामुळे झोपेचं चक्र देखील बिघडून जातं.
जेंव्हा अपर्णाला विचारलं एकटीला की का नाही रहायचं नवऱ्याजवळ तेंव्हा तिनी सरळ सांगितलं तो ‘माणसात नाहीय’.....नपुंसक आहे ...मला काहीच सुख नाही देऊ शकत तो ,मला नाही रहायचं त्याच्या जवळ’ हा आणखीन एक नवां पेच .....
काही केसेस अशा मारुतीच्या शेपटासारख्या लांबतच जातात ...आता गरज होती दोघांचं एकत्र सेशन घेण्याची.परत एक तारीख ....लिहिते त्याही बद्दल ........कोरड पडलीय घशाला ...पाणी घेऊन येते ..बाय द वे ...थंडी काय म्हणतेय? एक मफलर घेऊन ठेवलाय मी तुमच्यासाठी ...बघू केंव्हा देता येईल ते ..
मानसी

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Swati Dharmadhikari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Swati Dharmadhikari:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category