01/03/2026
आहार कथा
सर्दीपासून सुरू झालेला प्रवास…
तो ३३ वर्षांचा. उंची १८० सें.मी., वजन ९२ किलो.
दिसायला मजबूत, पण नेहमी एकच त्रास सतत सर्दी, नाक बंद, डोके जड.
सर्दीने तो खूप वैतागला होता
सुरुवातीला त्याने अॅलोपॅथी उपचार घेतले. थोडा आराम, पण कायमस्वरूपी फरक नाही.
मग तो आयुर्वेदाकडे वळला. औषधी, काढे, दिनचर्या बदल…
हळूहळू सर्दी कमी झाली. त्याला हलकं वाटू लागलं.
आणि वजनही कमी होऊ लागलं.
९२ वरून ८५…
८५ वरून ८०…
त्याला आनंद झाला. “वा! आरोग्य आणि फिटनेस दोन्ही मिळत आहेत!”
पण त्याला अजून “परफेक्ट” व्हायचं होतं.
तो एका यु ट्यूब वरून नॅचरल कोर्समध्ये सामील झाला. तिथे त्याला सांगितलं गेलं
“शरीरातल्या सगळ्या टॉक्सिन्स काढून टाका. हलकं खा. साधं खा. कमी खा.”
आणि एक आहार दिला गेला
त्याने अक्षरशः मनावर घेतलं.
सकाळ फक्त फळे.
मध्यान्ह थोडे ड्रायफ्रूट्स आणि बिया.
दुपार 2 मल्टीग्रेन भाकरी आणि भाजी.
संध्याकाळ फक्त सूप.
बस्स.
दिवसभरात मिळणारे प्रोटीन अवघे २० ग्रॅम.
कॅलरी खूपच कमी.म्हणजे फक्त 800 ते 1000
एका लहान मुलाच्या केलरीज आणि प्रोटीन
वजन ७० किलोवर आलं.
सर्दी गायब होती
पण आता आरशात दिसणारा चेहरा बदलला होता.
गाल आत गेलेले.डोळ्याखाली काळी वर्तुळे.
शरीरात जळजळ.सतत थकवा.
तो म्हणाला, “मी तर हेल्दी होण्यासाठी हे सगळं केलं…”
मग हे काय झालं
मी म्हटलं
हो. पण शरीराला फक्त टॉक्सिन्स नाही तर पोषणही लागते.
स्नायू, व्हिटॅमिन्स, क्षार देखील लागतात.
डिटॉक्स हा प्रवासाचा एक भाग असू शकतो,
पण कायमचं कमी खाणं हा उपाय नाही.
आरोग्य म्हणजे फक्त वजन कमी होणं नाही.
आरोग्य म्हणजे संतुलन.
आणि सर्वात महत्त्वाचं –
कोणाचाही सल्ला आंधळेपणाने पाळू नका.
योग्य शिक्षण आणि अनुभव असलेल्या तज्ञाकडून मार्गदर्शन घ्या.
कारण कधी कधी
आपण आज ज्या गोष्टीला “हेल्दी” समजतो,
तीच उद्या शरीरासाठी ओझं ठरू शकते.
नुसता आजार बर करणं इतकंच ध्येय नको
शरीराला त्याबरोबर पोषण ही मिळायला हवे
अर्चना रायरीकर