Gatha

Gatha Page is about Tukaram Maharaj's spiritual quotes

23/10/2025

जालो द्वारपाळ | तुझे राखिले सकळ ||
नाही लागो दिले अंगा | आड ठाकलो मी जागा ||
करूनिया नीती | दिल्या प्रमाणे चालती ||
हाती दंड काठी | उभा जिवाचिये साठी ||
बळ बुध्दी युक्ति | तुज दिल्या सर्व शक्ती ||
तुका म्हणे खरा | आता घेईन मुशारा ||

अर्थ-- तुकाराम महाराज म्हणतात कि देवा, मी तुझे द्वार रक्षण करणारा द्वारपाल झालो आणि सगळ्यांपासून तुझे रक्षण केले. मी तुझ्या आणि लोकांच्या मध्ये उभा राहिलो, लोकांना तुझ्या अंगाला लागू दिले नाही. लोकांना जी नीती घालून दिली आहे त्याप्रमाणे ते चालत आहेत. हातात दंड, काठी घेऊन जीवासाठी मी उभा आहे. देवा,बळ,बुध्दी, युक्ति तुला दिली, सर्व शक्ति तुला दिली. आता या सगळ्याचा मोबदला तुझ्याकडून घेणार आहे.

23/10/2025

पिंड पदावरी | दिला आपुलिया करी ||
माझें जालें गयावर्जन | फिटले पितरांचे ऋण ||
केले कर्मांतर | बोंब मारिली हरिहर ||
तुका म्हणे माझें | भार उतरलें ओझें ||

अर्थ-- तुकाराम महाराज म्हणतात कि मी माझा देह हरिच्या पायावर ठेवला आहे. त्यामुळे माझे गया तीर्थाटन झाले आहे, पितरांचे ऋण फिटले आहे. हरि आणि हर या नामांचा उच्चार मी केला आहे. त्यामुळे माझा भार उतरला आहे.

23/10/2025

दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद | पडिलीया शुध्द नव्हे मग ||
तैसे खळा मुखे न करावे श्रवण | अहंकारे मन विटाळले ||
काय करावी ती बत्तीस लक्षणे | नाक नाही तेंणें वायां गेली ||
तुका म्हणे अन्न जिरों नेदी माशी | आपुलिया जैसी संसर्गे ||

अर्थ-- घागरभर दुधात जर दारूचा थेंब पडला तर ते दुध नासते. तसेच अहंकाराने मन विटाळले असेल तर त्याला परमार्थाच्या गोष्टी ऐकू येत नाहीत. सौंदर्याची बत्तीस लक्षणे काय कामाची जर नाकच नसेल. तुकाराम महाराज म्हणतात कि अन्नात माशी पडली तर ते अन्न खाऊ शकत नाही.

23/10/2025

जैसे दावी तैसा राहे | तरि कां देव दुरी आहे ||
दुःख पावायाचे मूळ | राहाणी ठाव नाही ताळ ||
माळामुद्रावरी | कैचा सोंगे जोडे हरी ||
तुका म्हणे देखे | ऐसे परीची बहुतेक ||

अर्थ-- मनुष्य जसा भक्तिचा आभास बाहेर दाखवतो तसा तो आतून शुध्द भावाने राहिला तर देव त्याच्यापासून दूर आहे का ?? पण त्याची राहणी वेगळी, भाव वेगळा त्यामुळेच तो दुःखी होतो. माळा, मुद्रा अश्या बाह्य गोष्टींनी हरी जोडला जाऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कि असे अनेक ढोंगी पाहिले. खरा भक्त एकही दिसत नाही..

23/10/2025

संतांची उच्छिष्टे बोलतों उत्तरे | काय म्या गंव्हारे जाणावे हे ||
विठ्ठलाचे नाम घेता नये शुध्द | तेथे मज बोध काय कळे ||
करितो कवित्व बोबड्या उत्तरी | झणी मजवरी कोप धरा ||
काय माझी याति नेणों हा विचार | काय मी ते फार बोलो नेणें
तुका म्हणे मज बोलवितो देव | अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ||

अर्थ-- तुकाराम महाराज म्हणतात कि मी जे उत्तरादाखल बोलतो ते सर्व संतांचे उष्टे बोल बोलतो. नाहीतर मला गावंढळाला काय कळते? मला विठ्ठलाचे नावदेखील नीट घेता येत नाही मग मला आत्मबोध काय कळणार? मी माझ्या बोबड्या शब्दाने कवित्व करतो, तेव्हा तुम्ही माझ्यावर रागावू नका. माझी जात कोणती आहे ,काय आहे हे तुम्हालाच ठाऊक. मी जे बोलतो, ते देवच बोलवितो. त्यातील गूढ अर्थ काय आहे हे देखील तोच जाणतो.

23/10/2025

नाचे टाळी पिटी | प्रेमे अंग धरणी लोटी ||
माझे सखे ते सज्जन | भोळे भाविक हरिजन ||
न धरिती लाज | नाही जनासवे काज ||
तुका म्हणे दाटे | कंठ,नेत्री जळ लोटे ||

अर्थ-- जे भोळे भाविक हरिचे दास आहेत, जे टाळ वाजवितात, नाचतात, भूमीवर लोळण घेतात ते माझे सखे सोयरे आहेत. ते कश्याचीही लाज धरत नाहीत कारण त्यांना लोकांशी काही कर्तव्य नसते. तुकाराम महाराज म्हणतात कि हरिच्या प्रेमाने त्यांचा कंठ दाटून येतो, डोळ्यातून आनंदाश्रू येतात ते भक्त मला खूप आवडतात..

04/10/2025

चुंबळीशी करी चुंबळीचा संग | अंगी वसे रंग क्रियाहीन ||
बीजा ऐसे फळ दावी परिपाकी | परिमळ लौकिकी जाती ऐसा
माकडाच्या गळा रत्न कुळांगना | सांडुनिया सुना विधी धुंडी ||
तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी | फजिती ते व्हावी आहे पुढे

अर्थ-- जो वाईट असतो, तो वाईटाचाच संग करतो. त्याच्या अंगी असलेले क्रियाहीन रंग दिसतात. बी जसे असते तशीच फळे येतात. जो जसा वागतो तसेच त्याचे नाव होते. माकडाच्या गळ्यात रत्नहार घातला तरी तो तोडून टाकतो. दुर्जनाच्या घरी कुळवान स्त्री दिली तरी तो तिला सोडून इकडे तिकडे भटकत राहतो. कदाचित पुढे जाऊन फजिती व्हावी म्हणून त्याच्या मातेने जन्म दिला असे वाटते.

04/10/2025

भक्ताचा महिमा भक्तचि जाणती | दुर्लभ या गति आणिकांसी
जाणोनि नेणते जाले तेणें सुखें | न बोलोनि मुखें बोलताती ||
अभेदूनि भेदु राखियेला अंगी | वाढावया जगीं प्रेमसुख ||
टाळघोळ कथा प्रेमाचा सुकाळ | मूढ लोळपाळ तरावया ||
तुका म्हणे हें तों आहे तयां ठावे | तिहीं एक्या भावें जाणीतला

अर्थ-- भक्ताचा महिमा भक्तच जाणतात. इतरांना कळणे अवघड आहे. ज्यांनी विठ्ठलाचे स्वरूप जाणले ते सुखी झाले. ते मुखाने काही बोलले नाहीत तरी ते कळते. जे स्वतःच्या अंगी देव आणि आपण एकच आहोत असे समजतात ते जगात प्रेमसुख वाढावे म्हणून प्रयत्न करतात. अज्ञानी लोकांचा उध्दार व्हावा म्हणून ते टाळ वाजवून, हरीच्या नामाने प्रेमाचा सुकाळ करतात. तुकाराम महाराज म्हणतात कि श्रीहरी आहे हे जे जाणतात त्यांना ऐक्यभावना जाणवते.

04/10/2025

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभाव ||
येणे सोसे मन जालें हांवभरी | परती माघारी घेत नाही ||
बंधनापासूनी उकलली गांठी | देता आली मिठी सावकाश ||
तुका म्हणे देह भरिला विठ्ठले | कामक्रोधे केलें घर रिते ||

अर्थ-- तुकाराम महाराज म्हणतात कि विठ्ठलाचेच नाव घ्यावे. त्याचेच दर्शन घ्यावे. त्याच्यावरच प्रेम करावे. मनाला याचीच ओढ लागली आहे त्यामुळे मन परत संसाराकडे येत नाही. सर्व बंधनातून मुक्त झालो आहे. त्यामुळेच देवाला अलगद मिठी मारता आली. माझा संपूर्ण देहच विठ्ठलाने भरून गेला आहे त्यामुळे काम ,क्रोध यांनी माझे देहरूपी घर सोडले आहे.

04/10/2025

आपुले आपण जाणावे स्वहित | जेणें राहे चित्त समाधान ||
बहुरंगे माया असे विखुरली | कुंठितचि जाली होतां बरी ||
पुजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी | भाव विश्वंभरी समर्पावा ||
तुका म्हणे गेला फिटोनिया भेद | मग होतो देव मनाचाचि ||

अर्थ-- आपण आपले हित कश्यात आहे हे ओळखावे जेणेकरून आपले चित्त समाधानी राहिल. सगळीकडेच बहुरंगी माया पसरली आहे. त्यामुळे तिच्याविषयी आसक्ती कुंठित झालेलीच बरी आहे. आपण काहिच न बोलता विश्वंभराची पूजा करत रहावी, त्याला समर्पण करावे. तुकाराम महाराज म्हणतात कि एकदा का भेद नष्ट झाला कि मन देवरूप होते.



01/10/2025

इतुले करीं देवा ऐके हे वचन | समूळ अभिमान जाळी माझा ||
इतुले करी देवा एके हे गोष्टी | सर्व समदृष्टी तुज देखे ||
इतुले करी देवा विनवितो तुज | संतचरण वंदी माथां ||
इतुले करी देवा ऐके हे मात | ह्रदयी पंढरीनाथ दिवसरात्री ||
भलतिया भावे तारी पंढरीनाथा | तुका म्हणे आतां शरण आलों ||

अर्थ-- तुकाराम महाराज म्हणतात कि देवा माझे एक वचन ऐक. माझा संपूर्ण अभिमान जाळून टाक. देवा इतकेच कर कि माझी एक गोष्ट ऐक. मी तुझ्याकडे समदृष्टीने पहावे. देवा तुला विनवणी करतो कि संतचरणाची धूळ मी मस्तकी धारण करावी. हे देवा, दिवसरात्र पंढरीनाथ माझ्या हृदयात राहिल असे काहीतरी कर. मी तुला शरण आलो आहे आता तू मला तरून ने.

01/10/2025

आमुची जिवलगे सज्जन सोयरी | नांदतील तिरी भिंवरेच्या ||
तीच माझ्या चित्ती वसती दिवसराती | भेटावया खंती वाटतसे
संपदा सोहळे सर्वसुख वसे | वैकुंठी जे नसें सुरवरासी ||
ज्याच्या नामे पाप दुःख नासे भय | विठ्ठल बाप माय रखुमाई |
माझा जीव जीतो अमृत तें कळा | कंठी वेळोवेळी ध्यात असे |
तुका म्हणे वाट पाहतां शिणले | त्या पंथे डोळुले पंढरीच्या ||

अर्थ-- तुकाराम महाराज म्हणतात कि विठ्ठल, रखुमाई आमचे जिवलग, सगे सोयरे आहेत. ते चंद्रभागेच्या तिरी नांदत असले तरी तेच दिवसरात्र माझ्या मनात राहतात. म्हणून त्यांना भेटण्याची आस आहे. वैकुंठात जे सुख, संपन्नता मिळणार नाही ते सर्वसुख, सोहळा पंढरीत आहे. ज्याच्या नामाने पाप, दुःख, भय नाहिसे होते, तो विठ्ठल माझा बाप आहे, रखुमाई माझी आई आहे. माझ्या कंठात जे नामस्मरण आहे त्यामुळेच मी माझे जीवन जगतो. पंढरीच्या वाटेकडे सतत डोळे लावून बसलो आहे आणि माझे डोळे वाट बघून थकले आहेत.

Address

Hadapsar
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gatha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram